हेलिकॉप्टरचं इंधन संपलं अन् राहुल गांधींचं प्रचाराचं गणित बिघडलं

0
62

दि 9 एप्रिल (पीसीबी )- राहुल गांधी शहडोलमधील सभा संपल्यानंतरही तेथेच अडकून पडले. कारण ते ज्या हेलिकॉप्टरमधून आले होते त्यातील इंधन संपल्याने ते उड्डाण करू शकले नाही. इंधन संपल्याचे लक्षात येताच प्रशासनाची पळापळ झाली.
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पहिल्या टप्प्यातील मतदानास काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. सर्वपक्षीय नेते पूर्ण ताकदीनिशी निवडणूक प्रचारात गुंतले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी मध्य प्रदेश राज्यातील शहडोलमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेले होते. मात्र सभा संपल्यानंतर राहुल गांधी शहडोलमध्येच अडकून पडले. सांगितले जात आहे की, ज्या हेलिकॉप्टरमधून राहुल गांधी आले होते त्यातील इंधन संपल्याने ते उड्डाण करू शकले नाही. इंधन संपल्याचे लक्षात येताच प्रशासनाची पळापळ झाली. राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरसाठी भोपाळमधून इंधन मागवण्यात आले. मात्र इंधन पोहोचण्यास वेळ लागणार असल्याचे सांगितले गेले. दरम्यानच्या काळात राहुळ गांधी एका हॉटेलात थांबले होते.

राहुल गांधी ज्या हॉटेलात थांबले होते तेथेही त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. या हॉटेलमध्ये मधमाशांचे पोळे लागले होते. माहिती मिळताच मधमाशांना हटवण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झाले. हॉटेलमध्ये मधमाशांचे तीन पोळे होते ते हटवण्यासाठी चार सदस्यीय टीम पोहोचली होती.

दरम्यान अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही की, राहुल गांधी मंगळवारची रात्र शहडोलमध्ये घालवणार की, रस्तेमार्गाने जबलपूरकडे रवाना होणार. राहुल शहडोलमधील बाणगंगा ग्राउंडमध्ये झालेल्या सभेनंतर जबलपूरकडे रवाना होणार होते. शहडोलचे पोलीस अधीक्षक कुमार प्रतीक यांनी सांगितले की, इंधन संपल्याने राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकले नाही. इंधन उपलब्ध करण्याचे काम केले जात आहे. इंधनाची व्यवस्था होताच राहुल गांधी हेलिकॉप्टरने रवाना होतील, किंवा ते रस्तेमार्गानेही जाऊ शकतात.

त्यापूर्वी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी शहडोलमध्ये बाणगंगा मेला ग्राउंडमध्ये आयोजित सभेसाठी पोहोचले होते. येथे राहुल गांधींनी आदिवासी मतदारांवर फोकस केला. यावेळी राहूल गांधी म्हणाले की, जेथे ५० टक्के लोकसंख्या आदिवासी आहे, तेथे सहावी अनुसूची लागू केली जाईल. जेणेकरून आदिवासी आपला निर्णय स्वत: घेतील. यावेळी त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामाही वाचून दाखवला. अनेक मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
राहुल गांधी म्हणाले की, इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास अग्नि वीर योजना रद्द केली जाईल, कारण लष्कराचाही याला विरोध आहे. राहुल म्हणाले की, काँग्रेसचे सरकार बनल्यास देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी किमान हमीभाव दिला जाईल. महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब परिवारातील महिलेला वार्षिक एक लाख रुपये दिले जातील, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.