संविधान दिनानिमित्त ‘वॉक फॉर संविधान’; ‘छत्रपती ते घटनापती’ या पदयात्रा संपन्न

0
198

पिंपरी,दि.२८(पीसीबी) – संविधान दिनानिमित्त ‘वॉक फॉर संविधान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘छत्रपती ते घटनापती’ या पदयात्रा संपन्न झाली.संविधानाच्या जयघोषाने रविवारी पिंपरी शहर दुमदुमले.या कार्यक्रमाचा उद्देश संविधानातील मुलभूत अधिकार, कर्तव्ये आणि शाई ते लोकशाही सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे हा होता. या कार्यक्रमाचे आयोजन समता सैनिक दलाने केले होते.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना अस्तित्वात आली. या दिनाचे स्मरण म्हणून समता सैनिक दलातर्फे ‘वॉक फॉर संविधान’ ‘छत्रपती ते घटनापती’ या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात शहरातील विविध भागात करण्यात आले होते.या कार्यक्रमाचा समारोप काल रोजी झाली. या पदयात्रेचा मुख्य उद्देश भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, शाई ते लोकशाही, सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता. त्याची सुरुवात ०५ नोव्हेंबर पासून दापोडी येथून करण्यात आली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात आपल्या मूलभूत अधिकारांचे तब्बल एक लाख पत्रक घरोघरी पोहोचवण्यात आले, तसेच पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत विविध सामाजिक संघटना, पक्ष, मंडळे तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक चौकात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून ही पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा अनुक्रमे शहरातील दापोडी,कासारवाडी, लांडेवाडी, पिंपरी त्याचबरोबर आनंद नगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, मोहन नगर, प्राधिकरण, आकुर्डी, गांधीनगर, खराळवाडी, नाणेकर चाळ, वैशाली नगर, पत्रा शेड, रमाबाई नगर,बोपखेल इत्यादी ठिकाणी ‘वॉक फॉर संविधान’ ही पदयात्रा पार पडली.

दरम्यान, या पदयात्रेचा समारोप २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आला. यावेळी पिंपरी गावातील छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली.या वेळी चौकात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पाहार अर्पण करून या पदयात्रेचा समारोप झाला. या पदयात्रेत भारतीय सैन्याची तुकडी महार बटालियनच्या यश सिद्धी आजी-माजी सैनिक, बहुउद्देशीय वेल्फर असोसिएशन महाराष्ट्र राज्य माजी सैनिकांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. या पदयात्रेचे आयोजन समता सैनिक दलाचे सैनिक मनोज गरबडे यांनी केले होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.