मनोज जरांगे आंदोलनाचा मोठा फटका, संचारबंदीसह काही भागातील इंटरनेट बंद

0
119

जालना, दि. २६ (पीसीबी) – मनोज जरांगेंनी काल आंतरवाली सराटीमध्ये आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरगंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यानंतर ते सागर बंगल्याकडे रवाना झाले. मात्र, संचारबंदी लागू झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा आंतरवाली सराटीकडे जाण्याचा निर्णय घेतला. या भागात संचारबंद लागू केली असून पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर आता काही भागातील इंटरनेट देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आगारातील एसटी वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. या तिन्ही जिल्ह्यांमधील विभागातील सर्व आगारातील सर्व वाहतूक तात्पुरत्या बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली आहे. एसटी प्रशासन पोलिसांच्या संपर्कात आहे. वाहतूक सुरू करण्याबाबत पाठवुरावा केला जात आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

मनोज जरांगे यांच्या काही सहकाऱ्यासह एकूण पाच जणांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या सगेसोयरे मसुद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत आहेत.

तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवली, मराठा आंदोलक आक्रमक
जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. तिर्थपुरी गावात आज सकाळी अंबड येथून रामसगावकडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या या बसला आडवून अज्ञातांनी पेटवून दिली आहे.