धक्कादायक! देशातील 42 टक्के ग्रॅज्यूएट बेरोजगार; एमबीए, इंजिनिअरांना व्हायचंय ‘कारकून’

0
267

देशात बेरोजगारी घटत असून वेगाने रोजगार निर्मिती होत आहे. अर्थव्यवस्थाही वेगाने घोडदौड करत आहे, असे मोठे दावे सरकारकडून केले जात असले तरी प्रत्यक्षातील परिस्थिती मात्र वेगळीच आहे. मागील पाच वर्षांच्या काळात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील रोजगार तब्बल 31 टक्क्यांनी घटल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जानेवारी-मार्च 2023 मधील कामगार दल सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की शहरी भागातही 50 टक्क्यांपेक्षा कमी कामगार पगारदार आहेत.

देशातील 42 टक्के पदवीधरांच्या हाताला कामच नाही

भारतात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातील बेरोजगारीचे वाढते आकडे काळजीत टाकणारे आहेत. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी म्हटले आहे, की अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या एका रिपोर्टनुसार, 2021-22 मध्ये 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे 42 टक्के पदवीधर युवक बेरोजगार होते. जानेवारी 2023 मध्ये तब्बल 8 हजार उमेदवारांनी गुजरात विश्वविद्यालयात क्लार्क श्रेणीतील 92 पदांसाठी अर्ज केले होते. अर्ज करणाऱ्यांमध्ये एमएससी आणि एमटेक केलेलेही उमेदवार होते. जून 2023 मध्ये महाराष्ट्रात क्लार्कच्या 4 हजार 600 पदांच्या भरतीसाठी तब्बल 10.5 लाख लोकांनी अर्ज केले होते. अर्ज करणाऱ्यांमध्ये चक्क एमबीए, इंजिनियर आणि पीचडी अशा मोठ्या डिग्री घेतलेले उमेदवार होते.

आगामी निवडणुकीत बेरोजगारी हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असू शकतो, असा अंदाज आहे. भाजपचे सरकार आल्यापासून दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वसन हवेत विरले आहे.