घरांच्या विक्रीत तब्बल २० टक्के घट

0
16

मुंबई, दि. २ ( पीसीबी ) : देशांतर्गत गृहनिर्माण क्षेत्रात यंदाच्या वर्षात सातही शहरांमधील दुसऱ्या तिमाहीतील घरांच्या विक्रीत २० टक्के घट झाली आहे. मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत घरांच्या विक्रीत घट झाली आहे.

देशातील सात प्रमुख शहरांचा विचार करता यंदाच्या एप्रिल, मे या दुसऱ्या तिमाहीतील महिन्यांत ९६,२८५ घरांची विक्री झाली असून हीच संख्या गतवर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत एक लाख २० हजार इतकी होती. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षातील जानेवारी ते मार्च कालावधीतील पहिल्या तिमाहीत ही संख्या ९३,२८० इतकी होती. त्यात केवळ चेन्नईमध्ये गतवर्षीच्या तुलनेत विक्री ११ टक्क्यांनी वाढली आहे.

देशातील एनसीआर, मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता या सातही प्रमुख शहरांचा विचार करता घरांच्या विक्रीत घट झाली असली तरीही पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत तीन टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यातील एकूण विक्री ४८ टक्के एवढी असल्याचे अॅनारॉकच्या अहवालात नमूद केले आहे. मुंबईत ३१,२७५ आणि पुण्यात १५,४१० घरांची विक्री झाली आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्ये वार्षिक स्तरावर घरांच्या विक्रीची नोंद पाहिल्यास त्यात ११ टक्के वाढ होत ही संख्या ५,६६० एवढी झाली आहे.

तिमाहीचा विचार करता चेन्नईमध्ये यंदाच्या २०२५ पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ४० टक्के वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने उच्चभ्रू आणि मध्यम स्तरावरील घरांच्या विक्रीचा समावेश आहे. नवीन गृहसाठा मंदावल्याचे आढळून आले असून त्यात नवीन प्रकल्पांची संख्याही घटत चालली आहे. या प्रमुख सात शहरांमध्ये नवीन घरांची उपलब्धता गेल्या वर्षाच्या तुलनेत १६ टक्क्यांनी कमी झाला आहे. २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत एक लाख १७ हजार नवीन घरे उपलब्ध झाली होती, त्या तुलनेत यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत ९८,६२५ घरांचा पुरवठा झाला. यंदाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत त्यात एक टक्का घट आहे. नवीन पुरवठ्याची तुलना करता मुंबई महानगर, एनसीआरचा एकत्रित वाटा ४८ टक्के आहे. केवळ मुंबई महानगर क्षेत्रात २८,१६५ आणि एनसीआरमध्ये १८,७६० नवीन घरांचा पुरवठा झाला. एनसीआरमध्ये घरांच्या किंमतीत वाढ झाली असून त्या भागात वार्षिक स्तरावर २७ टक्के, बेंगळुरूमध्ये १२ आणि हैदराबादमध्ये ११ टक्के वाढ आहे.

यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत देशांतर्गत गृहनिर्माण क्षेत्रास बरीच झळ बसली. देशाच्या सीमेसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य स्थितीचा हा परिणाम असल्याचे अॅनारोंक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले. मुंबईसह अन्य शहरांचा विचार करता घरांच्या किंमती हा प्रमुख घटक आहे. अस्थिर वातावरणाचा घरांच्या खरेदीवर परिणाम होत असतो. परिस्थितीनुरूप त्यात बदल होत असून घरांच्या किंमती नियंत्रणात आल्यास मध्यमवर्गीयांना आधार मिळेल, असे वास्तुविशारद दिनेश वराडे यांनी सांगितले.