आरक्षणाला विरोध केला तर वाजवलीच म्हणून समजा, मग कोणी का असेना

0
256

आळंदी, दि. २० (पीसीबी) – राज्य सरकारनं दिलेलं आश्वासन हे सरसकट मराठ्यांना आरक्षणाचं आहे, की फक्त कुणबी प्रमाणपत्र देण्याचं यावरून राज्य सरकार व मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकांमध्ये तफावत आहे. जरांगेंनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यांचा दौराही सुरू आहे. दुसरीकडे आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे कामही सुरू आहे. या समितीतील नेत्यांना जरांगे आज फोन करून आरक्षणाचं काय झालं, असा सवाल करणार आहेत. आळंदीत ते माध्यमांशी बोलत होते. आरक्षणाला विरोध करणारा कोणी का असेना वाजवलीच म्हणून समजा, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

आपण काल (रविवार) दिवसभर नेत्यांना फोन लावत होतो. मात्र, कुणाशीही संपर्क झाला नाही. आज (सोमवार) पुन्हा सरकारच्या समितीतील नेत्यांना फोन लावून आरक्षणाचं काय झालं विचारणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं.
मराठा समाज ओबीसीत असेल आणि आम्हाला रोखू नका. ही गोरगरिबांच्या लेकरं सर्व निकष पूर्ण करीत आहेत, तरी तुम्ही मराठा समाजाला आरक्षण घेऊ देत नसाल तर तुमची ही कुठली भूमिका? असं म्हणत जरांगे पाटलांना वडेट्टीवारांना थेट सवाल केला आहे. कुणी कितीही ताकद लावली तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“हे आंदोलन सरकारशी समेट घालायला नाही, तर मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे. म्हटलं म्हातारा माणूस आहे म्हणून मी काही बोलत नाही, पण मराठा आरक्षणाला विरोध केला, तर मग मात्र काय खरं नाही,” असे म्हणत जरांगेंनी भुजबळांचे नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे.