सात राज्यांतील पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचाच बोलबाला! भाजपाचा दारूण पराभव

0
83

देश, दि. १४ जुलै (पीसीबी) – बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यातील १३ जागांवर बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्या.

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विरुद्ध एनडीएमध्ये अटीतटीची लढत झाली होती. या लढतीत इंडिया आघाडीचा निसटता पराभव झाला. तर एनडीएला बहुमतासाठी कसरत करावी लागली. परिणामी लोकसभा निवडणुकीत जनतेचा संभ्रमित कौल होता. दरम्यान, लोकसभेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. सात राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीच्या दहा जागा आल्या आहेत. तर, केवळ दोन जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. यावरून काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एनडीए सरकारवर टीका केली आहे.

“सात राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे भाजपाने विणलेले ‘भय आणि संभ्रमाचे’ जाळे फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी, तरुण, मजूर, व्यापारी, नोकरदार अशा प्रत्येक वर्गाला हुकूमशाही पूर्णपणे नष्ट करून न्यायाचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. लोक आता त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी पूर्णपणे इंडिया आघाडीबरोबर उभे आहेत. जय हिंदुस्थान, जय संविधान”, असं राहुल गांधी म्हणाले.

बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यातील १३ जागांवर बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. विविध पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या मृत्यूमुळे किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांमुळे पोटनिवडणूक घेण्यात आली. बिहारमधील रुपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला; तामिळनाडू मधील विक्रवंडी; मध्य प्रदेशातील अमरवारा; उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगळौर; पंजाबमधील जालंधर पश्चिम आणि हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढ या ठिकाणी मतदान झाले.

कोणत्या जागेवरून कोण जिंकून आलं?
बिहारच्या रुपौली विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकर सिंग, हिमाचलच्या देहरा मतदारसंघात काँग्रेसच्या कमलेश ठाकूर, हमीरपूर मतदरासंघात भाजपाचे आशीष शर्मा, नलागढ मतदारसंघात काँग्रेसचे हरदीप बावा; मध्य प्रदेशच्या अमारावा मतदारसंघातून भाजपाचे कमलेश शाह; पंजाबच्या जालंधर पश्चिम मतदारसंघातून आपचे मोहिंदर भगत; तामिळनाडूच्या विक्रवांदी मतदारसंघातून द्रविड मुनेत्रा काझिगम मतदारसंघातून अन्नूर सिवा; उत्तराखंडच्या बद्रीनाथ येथून काँग्रेसचे लखपत सिंग बुतोला; मंगळौर मतदारसंघातून काँग्रेस काझी मोहम्मद निझामाद्दीन; पश्चिम बंगालच्या रायगंज येथून तृणमूल काँग्रेसच्या कृष्णा कल्याणी, राणाघाट दक्षिणमध्ये तृणमूलच्या मुकूट अधिकारी, बागडा येथून तृणमूलच्या मधुपर्णा ठाकूर आणि मनिकताला येथून तृणमूलच्या सुप्ती पांडे विजयी ठरल्या आहेत. म्हणजेच, इंडिया आघाडीतील घटक पक्षांनीच सर्वाधिक विजय मिळवला आहे.