मुलाला शाळेत सोडविण्यासाठी निघालेल्या महिलेच्या दुचाकीला ट्रकची धडक; महिलेचा मृत्यू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

मुलाला शाळेत सोडविण्यासाठी जात असलेल्या महिलेच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. 24) सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास राम कृष्ण हरी चौक देहू आळंदी रोड चिखली येथे घडला.

जयश्री पंकज खोपे (वय 30) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वैभव भानुदास आगरकर (वय 26, रा. वारजे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एमएच 12/एलटी 9907) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मामे बहीण जयश्री खोपे या त्यांच्या मुलाला शाळेत सोडवण्यासाठी दुचाकीवरून जात होत्या. त्या देहू आळंदी रोडवर राम कृष्ण हरी चौकात आल्या असता त्यांच्या दुचाकीला भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये जयश्री आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले. त्यातच जयश्री यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article