कोणावरीलही गुन्हे मागे घेतलेले नाहीत – अमित शहा

bpcauthor bpcauthor
2 Min Read

कोणावरीलही गुन्हे मागे घेतलेले नाही. सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे त्यांच्यावर न्यायालय कारवाई करेल. आमच्या मार्गदर्शनानुसार न्यायालय चालत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यांना भाजपला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? असा सवाल करण्यात आला होता, यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

अमित शहा पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही म्हणत असाल तर आम्ही हे प्रकरण पुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवतो. पण इतर अनेक सामान्य नागरिकांचीही प्रकरणे प्रलंबित असतात. त्यांनाही न्याय दिला पाहिजे. राष्ट्रवादीत फूट पाडून भाजपाबरोबर गेलेल्या अजित पवारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोडो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. असा आरोप केल्याच्या काहीच दिवसांत अजित पवारांनी भाजपला साथ दिली. त्यामुळे भाजपत गेल्याने अजित पवारांवरील गुन्हे रद्द झाले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

यंत्रणा त्यांचे काम करतील

अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी, सोनिया गांधी, पी. चिंदबरम यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. पण त्यांची प्रकरणे आता कुठे सुरू आहेत. यांच्यावर 9-10 वर्षांपासून गुन्हे दाखल आहेत. आम्ही आमचे काम केले. आता यंत्रणा यांची चौकशी करतील, असे त्यांनी म्हटले आहे.

भोपाळच्या सभेत काय केला होता आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. एनसीपीवर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खोदकाम घोटाळा अशी ही यादी न थांबणारी असल्याचा हल्लाबोल पंतप्रधानांनी केला होता. या आरोपानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. आता अजित पवार हे महायुतीतील घटक आहेत.

Share This Article