डाव्‍या विचारसरणीला रोखण्‍याची क्षमता भारत देशात आहे ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

bpcauthor bpcauthor
3 Min Read

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीचे ‘जिल्हा स्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहात संपन्न !

पुणे, दि. ८ (पीसीबी) – डाव्या शक्तींनी कुटुंब-व्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम, संस्कृती ही आपली शक्तिस्थाने पोखरण्याची रणनीती आखली आहे. चुकीच्‍या विचारांची मांडणी करून ते पोचवण्‍यासाठी आवश्‍यक परिसंस्‍था त्‍यांच्‍याकडे आहे. डाव्या विचारसरणीने केवळ आपल्या देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला पोखरले आहे त्यातून जगभर ते विध्वंस करत आहेत. डाव्‍या विचारसरणीला रोखण्‍याची क्षमता भारत देशात आहे असे परखड मत लेखक, प्रसिद्ध ब्रँड कन्सल्टंट अभिजित जोग यांनी व्यक्त केले. सेनापती बापट रोड येथील इंद्रप्रस्थ सभागृहामध्ये 7 जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘जिल्हा स्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बांगलादेशी घुसखोरी, अर्बन नक्षलवाद, वक्फ बोर्ड, हलाल जिहाद, मंदिर आघात आणि संघटनेची आवश्यकता, गड किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण आदी विषयांवर मान्यवरांचे विस्तृत मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील 140 हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. अधिवेशनच्या प्रारंभी प.पू. सद्गुरू रामनाथजी येवले महाराज, ब्रिगेडिअर श्री. हेमंत महाजन, श्री. अभिजीत जोग, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्री. विजय चौधरी यांनी शंखनाद केला. हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा हिंदु राष्ट्र अधिवेशना ’साठीचा संदेश वाचून दाखवण्यात आला. अधिवेशनचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सांगितला. यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.

धर्म रक्षणासाठी प्रत्येकाने जागृत व्हायला पाहिजे असे प.पू. सद्गुरू रामनाथजी येवले महाराज यांनी सांगितले. तर राजकीय इच्छाशक्तीच्या आधारे आणि कायद्याची कठोर कार्यवाही झाल्यास बांगलादेशी बांगलादेशी घुसखोरांची समस्या संपवता येईल असे मत ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी व्यक्त केले. वक्फ बोर्डाला एकही इंच जमीन आम्ही घेऊ देणार नाही असे सांगून वक्फ कायदा आणि हिंदु धर्माच्या विरोधातील षडयंत्राविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी उपस्थितांना अवगत केले. ‘धर्मकार्य करतांना साधनेची आवश्यकता काय’ या विषयावर सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी मार्गदर्शन केले. गड-दुर्ग यावरील अतिक्रमणाविषयी काय उपाययोजना करायला हवी या विषयी समस्त हिंदु बांधवचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पडवळ यांनी उपस्थितांना संबोधित केले.

त्याचप्रमाणे काश्मीरमधील अल्पसंख्यांकांच्या हत्या आणि हिंदूंचा नरसंहार याविषयी यूथ फॉर पनून कश्‍मीरचे सचिव श्री. रोहित भट यांनी तसेच अनेक राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी रुखमंगद पोतदार यांनी ‘हिंदू संघटन आणि मीडिया मॅनेजमेंट’ या विषयी मार्गदर्शन केले. जोतिर्लिंग भीमाशंकर देवस्थानचे श्री. सुरेश कौदरे यांनी धर्मविरोधी शक्तींचे कटकारस्थान विषयी मार्गदर्शन केले.

मंदिर आघात आणि संघटनेची आवश्यकता याविषयी श्री. ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी
मार्गदर्शन केले तसेच मंदिर महासंघाची भूमिका स्पष्ट केली. आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अनागोंदी कारभार आणि धर्म शिक्षणाची आवश्यकता याविषयी कु. क्रांती पेटकर यांनी मार्गदर्शन केले. यानंतर हिंदू धर्मावर होणारे विविध आघात आणि उपाय यावर परिसंवाद घेण्यात आला. त्यामध्ये सूत्रसंचालक म्हणून श्री. श्रीकांत बोराटे आणि श्री. चैतन्य तागडे सहभागी झाले तसेच श्री. ऋषिकेश कामते, श्री. विजय नरेला, श्री. गणेश ताकवणे, कु. प्राची शिंत्रे हे सहभागी झाले होते.

शेवट आभार प्रदर्शन आणि श्लोक म्हणून कार्यक्रमाचा समारोप झाला.

Share This Article