“परिपाठ भेदांच्या भिंती भेदून समानता शिकवतो!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

0
204

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – ” परिपाठातून सद्विचारांचा, देशप्रेमाचा नकळत संस्कार होतो. त्यामुळे परिपाठातून भेदांच्या भिंती भेदून समानतेची शिकवण मिळते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे शुक्रवार, दिनांक १६ जून २०२३ रोजी व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले लिखित आणि उत्कर्ष प्रकाशन निर्मित ‘शालेय परिपाठ व उपक्रम’ या पुस्तकाचे प्रकाशन गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालक अशोक राजगुरू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे कार्यवाह माधव राजगुरू, ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, प्रकाशक सु. वा. जोशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होते.

गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “बीजाचे वृक्षात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे जणू काही परिपाठच होय. त्यामुळे शालेय जीवनात परिपाठाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्रीकांत चौगुले यांनी आपल्या पुस्तकातून अनेक बाबींचा ऊहापोह केला आहे!” यावेळी माधव राजगुरू यांनी ‘असे कसे?’ या कवितेच्या माध्यमातून समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांशी हितगुज केले. किसनमहाराज चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या. श्रीकांत चौगुले यांनी आपल्या मनोगतातून, “अध्यापनातील पस्तीस वर्षांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षकांना उपयुक्त ठरेल असे लेखन ‘शालेय परिपाठ व उपक्रम’ या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे!” अशी लेखनामागची भूमिका व्यक्त केली. अशोक राजगुरू यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि देशभक्तिपर विषयांना एकाच पुस्तकाच्या माध्यमातून स्पर्श करण्याचा प्रयत्न सफल झाला आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ शिक्षकच नाही तर सर्वांसाठी उपयुक्त आहे!” असे गौरवोद्गार काढले.

धनश्री चौगुले, पूनम गुजर, सतीश अवचार, प्रफुल्ल भिष्णुरकर, लीना आढाव, शरद काणेकर, नंदकुमार मुरडे, एम. पी. चौगुले यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.