“मला पुन्हा संधी म्हणजे पवार साहेबांनी दिलेली शाब्बासकीच” – अमोल कोल्हे

0
297

हडपसर, दि. ९ (पीसीबी) – कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या व्यक्तीला २०१९ मध्ये लोकसभेच तिकीट देऊन निवडून आणणे हे आणि माझे काम बघून मला पुन्हा एकदा २०२४ साठी सज्ज राहण्यास सांगणे म्हणजे माझ्यासाठी ही शाबासकीच आहे. त्यामुळे आता पक्षातील नेत्यांनी आणि पवार साहेबांनी दाखवलेल्या विश्वासाला मी पूर्ण करेल”, असे मत देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

अमोल कोल्हेंनी सोडला सुटकेचा निश्वास
२०२४ च्या लोकसभेसाठी सध्या सगळ्याच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातून नेमकी कोणी निवडणूक लढवायची याचा पेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होता. परंतु काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पुण्यातील बैठकीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनाच पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याचे निश्चित झाले आणि अमोल कोल्हेंनी सुटकेचा निश्वास सोडला.

खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने नेते विलास लांडे अनेक दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी यासाठी लागणारी तयारी देखील पूर्ण केलेली होती. त्यांचे नाव देखील शरद पवार यांच्यासमोर होते. परंतु शरद पवार आणि अनेक नेत्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा २०२४ च्या लोकसभेसाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगताच आज खासदार अमोल कोल्हे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारसंघातले विविध प्रश्न देखील जाणून घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद देखील साधला यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “पवार साहेबांनी आणि पक्षातील जुन्या जाणकार नेत्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि माझे पुन्हा एकदा नाव निवडणूक लढवण्यासाठी घोषित केले, हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.”

“माझ्यासारख्या कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या व्यक्तीला २०१९ मध्ये लोकसभेच तिकीट देऊन निवडून आणणे हे आणि माझे काम बघून मला पुन्हा एकदा २०२४ साठी सज्ज राहण्यास सांगणे म्हणजे माझ्यासाठी ही शाबासकीच आहे. त्यामुळे आता पक्षातील नेत्यांनी आणि पवार साहेबांनी दाखवलेल्या विश्वासाला मी पूर्ण करेल”, असे मत देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.