आमदार संतोष बांगर यांची हकालपट्टी

2 Min Read

हिंगोली, दि. ११ (पीसीबी) : जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठा धक्का दिला असुन बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हा शिवसेना प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे. बांगर हे पक्षातून बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर हिंगोली जिल्हा भरात शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हा प्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. शिवसेनेकडून हा मोठा धक्का बांगर यांना दिला गेला आहे.

२००९ पासून आमदार संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. आता त्यांना या पदावरुन हटवण्यात आले आहे. बांगर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर आता नवीन जिल्हा प्रमुख निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठी जिल्ह्यातील शिवसैनिकांची चाचपणी करीत आहे.

दरम्यान बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशीपर्यंत ठाकरें सोबत असलेले कळमनुरीचे आमदार संतोष बांगर बहुमत चाचणीच्या दिवशी बंडखोरांच्या बसमध्ये दिसले. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केलं होत. ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंड केला आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतरही आमदार निघून गेले, त्यावेळी संतोष बांगर ढसाढसा रडले होते. मी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक म्हणत ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी रडलेही होते. त्या नंतर बांगर अवघ्या काही तासांत हे शिंदे गटात सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बांगर त्यांच्यासोबत कसे आले याचा किस्सा सांगितला होता.

संतोष बांगर यांनी बंडखोरी केल्यानंतर हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी हिंगोली शहरात शिवसैनिकांची बैठक घेतली होती. या बैठकीत थेट उद्धव ठाकरे यांनी फोनवरून शिवसैनिकांशी संवाद साधला. ज्यांना आपण दिले ते सोडून गेले ज्यांनी आपल्याला दिलं ते सोबत आहेत, असे बोलत ठाकरे यांनी बांगर यांचा समाचार घेतला होता. त्यामुळे आता मु सर्वांना भेटायला मी येणार आहे. असे आश्वासन यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलं होतं.
दरम्यान पक्षविरोधी कारवाई मुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बांगर यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटविले आहे

Share This Article