दि . ४ ( पीसीबी ) – २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिलांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ दिला जात होता. निवडणुकीनंतर ही योजना बंद पडेल, असं बोललं जात होतं. तर आमचं सरकार निवडून आल्यानंतर पात्र महिलांना २१०० रुपये देऊ असं आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात येत होतं.
आता निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अनेक त्रुटी समोर येत आहे. या योजनेसाठी सरकारकडून घालून दिलेल्या अटींची पूर्तता न करणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. शिवाय काही पुरुषांनी देखील कागदपत्रांमध्ये अफरातफर करून या योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलं. या सगळ्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ही योजना प्रत्यक्षात आणताना चूक झाली, अशी जाहीर कबुली दिली आहे. त्यांनी पहिल्यांदाच याबाबतचं वक्तव्य केलं.
ज्यावेळी आम्ही ही योजना आणली. तेव्हा आमच्याकडे फार कमी काळ होता. दोन तीन महिन्यात निवडणूक लागू झाली होती. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जांची तपासणी करण्यासाठी जो वेळ आवश्यक होता, तेवढा वेळ आम्हाला मिळाला नाही. जे या योजनेच्या नियमांत बसत नाहीत, ते अर्ज करणार नाहीत, असं आम्हाला वाटलं होतं. पण काहींनी अर्ज केले. आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घेऊ शकत नाही. पण सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं, अशी कबुली अजित पवारांनी दिली.
अजित पवारांच्या या कबुलीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यात अर्थ खात्यातून मोठा घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “अजित पवारांनी राजीनामा द्यावा. अर्थ खात्यातून हा घोटाळा झाला आहे. पैसे कुणी दिले. राज्याचे पैसे कुणी लुटले. या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिले. लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून शेकडो कोटी रुपयांचा लाभ घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला. तुम्ही छाननी केली नाही. तुम्हाला माहीत होतं, पण तुम्ही छाननी केली नाही, कारण तुम्हाला मतं पाहिजे होती. अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली. याचं प्रायश्चित कुणी करायला पाहिजे?” असा सवालही राऊतांनी विचारला.