“हिंदू समाज देशाचा कर्ता, काहीही घडलं तरी…”- मोहन भागवत

0
14

मुंबई, दि. १६ (पीसीबी) :  “हिंदू असणं म्हणजे उदार असणे, प्रत्येकाला सद्भावना दाखवणे, मग त्यांची धार्मिक श्रद्धा, जात, आहार पद्धत काहीही असो”, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. रविवारी राजस्थानातील अलवर या ठिकाणी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. “हिंदू समाज हा देशाचा कर्ता आहे. त्यामुळे या देशात काहीही घडले तरी त्याचा परिणाम हिंदू समाजावर होतो आणि चांगले घडले तर हिंदूंचा अभिमान वाढतो, कारण हिंदू समाज हा देशाचा शिल्पकार आहे”, असे मोहन भागवत म्हणाले.

“आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो, तोच मुळात एक वैश्विक मानवधर्म आहे. हिंदूंना सर्वांचे कल्याण हवे असते. हिंदू असणे म्हणजे जगातील सर्वात उदार व्यक्ती असणे, जी व्यक्ती सर्वांना सामावून घेते, सर्वांसमोर सद्भावना दाखवते. हिंदूंना या मूल्यांचा वारसा त्यांच्या महान पूर्वजांकडून मिळालेला आहे. ते शिक्षणाचा वापर कोणालाही कमी दाखवण्यासाठी नाही तर ज्ञान वाटण्यासाठी करतात. तसेच संपत्तीचा वापर हा स्वत:साठी न करता परोपकारासाठी करतो. तसेच शक्तीचा वापर दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी करतो”, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

“हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचं रक्षण करणाऱ्याला हिंदू मानले जाते. तो कोणाची पूजा करतो, कुठली भाषा बोलतो, त्याची जात, प्रदेश किंवा आहाराच्या सवयी काय, याचा काहीही फरक पडत नाही. एकेकाळी लोक संघाला फारसे ओळखत नव्हते. पण आता त्याला व्यापक मान्यता प्राप्त झाली आहे. लोक आदराने याकडे बघतात. संघाला बाहेरून विरोध करणारे अनेक लोक आहेत. पण मनातून तेच लोक याचा आदर बाळगतात”, असे मोहन भागवत यांनी म्हटले.

“राष्ट्राच्या विकासासाठी हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी सामाजिक समरसता, पर्यावरण, कौटुंबिक मूल्य, आत्म-जागरूकता आणि नागरी अनुशासन या पाच मूलभूत तत्त्वांचा अवलंब आणि प्रचार करावा”, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले.

“सध्या महाराष्ट्रात कौटुंबिक मूल्यांमध्ये घसरण होत आहे. यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर जबाबदार आहे. यामुळे तरुण पिढीचा पारंपारिक मूल्यांशी झपाट्यानं स्पर्श होत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी आठवड्यातून एकदा धार्मिक कार्यक्रम आणि भोजनासाठी एकत्र यावं. यामुळे परस्पर संबंध दृढ होतील. तसेच सांस्कृतिक मूल्यांचं संरक्षण होईल”, असे मोहन भागवत यांनी म्हटले.