हिंदु संत आणि संप्रदाय यांची बदनामी करणार्‍या ’महाराज’ चित्रपटावर तत्काळ बंदी घाला !

0
89

पुणे, दि. १२ (पीसीबी) – भारत ही साधू-संतांची भूमी आहे. संतांनी संपूर्ण विश्‍वामध्ये जाऊन भारतीय संस्कृती, धर्म, ज्ञान, कला, सभ्यता, सदाचार, तसेच भगवद्भक्ती शिकवूण समाजाला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. असे असतांना अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान, तसेच ‘यशराज फिल्म्स’ यांच्या ‘महाराज’ या चित्रपटातून साधूसंतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. 12 जून या दिवशी दुपारी 4 वाजता श्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, कोथरूड, पुणे येथे हे आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांच्यासह समविचारी संघटनाही सहभागी झाल्या होत्या.

   यापूर्वीही आमिर खानच्या ’पीके’ चित्रपटातही भगवान शिवाविषयी अपमानास्पद दृष्ये आणि आक्षेपार्ह संवाद दाखवले होते. हिंदु संतांना गुंड म्हणून दाखवले होते. आता तोच प्रकार ’महाराज’ या चित्रपटातून त्याचा मुलगा करत आहे. 150 वर्षापूर्वी इंग्रजांच्या राजवटीतील एका घटनेवरून आज पुन्हा साधूसंत आणि वल्लभ संप्रदाय यांच्याविषयी चुकीचे चित्रण उभे केले जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देशभर साधूसंतांची आणि वल्लभ संप्रदायाची बदनामी करण्याचे षड्यंत्र केले जात आहे. या चित्रपटात साधू-संत हे दुराचारी आणि वासनांध असतात, असे दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, तर त्याला सर्वस्वी जुनैद खान, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्स हे जबाबदार असतील.

  जुनैद खान, अमिर खान, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्स हे मदरश्यांमध्ये मौलवींद्वारे होणारे मुला-मुलींचे लैंगिक शोषण या विषयावर चित्रपट बनवतील का?, लहान मुलांची माथी भडकवून त्यांना जिहादी कृत्यांसाठी प्रोत्साहित केले जाते, त्यांच्याकडून आतंकवादी आणि देशविघातक कृत्ये कशी करवून घेतली जातात, या विषयावर चित्रपट बनवतील का? चर्च वा चर्चप्रणीत वसतीगृहामध्ये ख्रिस्ती धर्मगुरुंकडून होणारे मुले आणि महिलांचे शोषण या विषयावर चित्रपट बनवतील का? अशा विषयांवर चित्रपट काढण्याचे धाडस बॉलीवूड करणार नाही; मात्र हिंदु संतांना, हिंदु धार्मिक कृत्यांना सहजतेने लक्ष्य केले जाते. हिंदु सहिष्णु असल्याने आणि ’सेक्युलरिझम’ च्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवले जाते. हे कदापि सहन केले जाणार नाही. या चित्रपटाच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हिंदूंच्या सहनशीलतेचा सरकारने अंत पाहू नये. सरकारने या चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी. तसेच देवता, धर्म, संत आदींचा अवमान रोखण्यासाठी ’ईशनिंदा विरोधी कायदा’ देशभरात लागू करावा, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली.