हिंदुत्वाची शिकवणी देऊ नका! उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल

0
3

दि.११ (पीसीबी) – नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘हिंदुत्व’ केंद्रस्थानी आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार घणाघात करत, “हिंदुत्व शिकवण्यासाठी ना शाहांची गरज, ना भाजप- संघाची!” असे खडसावले.
उद्धव ठाकरे नागपूरात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी अमित शाह यांच्या टीकेवर पलटवार करत अनेक वादग्रस्त मुद्दे समोर आणले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शाह यांनी त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेण्यापूर्वी, त्यांच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत, जे सांगतात की ‘मी गोमांस खातो कोण मला अडवतो बघतो’. यावेळी ठाकरे यांनी रिजिजू अमित शाह यांच्यासोबत जेवतानाचे छायाचित्र दाखवले. ठाकरे यांनी अमित शाह यांना आव्हान दिले की, जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रिजुजू यांना मंत्रिमंडळातून त्वरित काढावे, कारण रिजुजू हे गोमांस खातात असे त्यांनी स्वतः बोलले आहेत. ते म्हणाले की, पालघरमध्ये घडलेल्या साधू हत्याकांडावरून सरकारला बदनाम करण्यासाठी भाजप/शाह यांनी आकाश-पाताळ एक केले होते. ठाकरे यांनी प्रश्न विचारला की, साधू हत्याकांडातील संबंधित व्यक्तीला भाजपात घेताना अमित शाह यांचे हिंदुत्व काय मेलं होतं? अमित शाह यांनी माझ्या हिंदुत्वावर शंका घेण्यापूर्वी, त्यांच्या बुडाखाली असलेले हिंदुत्व पाहिले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

ठाकरे यांनी सांगितले की, जर त्यांनी आणखी काही गोष्टी बाहेर काढल्या, तर अमित शाह यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी बाहेर येतील. उदाहरणे देताना त्यांनी जिनांच्या थडग्यावरती कोणी जाऊन डोकं टेकलं होतं आणि नवाज शरीफचा केक कोणी खाल्ला होता, अशी विचारणा केली. जय शाह पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतात, जो देश अतिरेकी कारवाया करतो. तेव्हा अमित शाह यांचे हिंदुत्व कोणत्या टोपीखाली दडते, असा प्रश्न त्यांनी विचारला. जर जय शाह त्यांचे ऐकत नसतील आणि त्यांना हिंदुत्व मान्य नसेल, तर त्यांनी जय शाह यांना क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा द्यायला लावावा, नाहीतर हिंदुत्व तरी स्वीकारावे, असे ठाकरे म्हणाले. भाजप, अमित शाह यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली पक्षीय अजेंडा चालवू नये, असो टोलाही त्यांनी लगावला.
मंदिर पाडून संघाचे कार्यालय उभारणे योग्य आहे का?

त्यांनी पुढे सांगितले की, दिल्लीमध्ये संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडण्यात आले, अशी बातमी जोरात चालली होती. संघाच्या कार्यालयासाठी मंदिर पाडून तिथे संघाचे कार्यालय उभारणे हे योग्य आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. संसदेच्या अधिवेशनात वंदे मातरम या विषयावर चर्चेवरूनही ठाकरे यांनी हल्लाबोल केला. एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावर किंवा राष्ट्रगीतासारख्या विषयावर इतक्या वर्षानंतर अचानक चर्चा कशी होऊ शकते, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.

ठाकरे म्हणाले की, भाजपचे वंदे मातरम हे फक्त ‘वन डे मातरम’ (एका दिवसासाठी) असते, कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काही पर्वा नसते. ठाकरे यांनी म्हटले की, ही चर्चा संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली गेली असावी. श्यामा प्रसाद मुखर्जी (ज्यांना भाजप/संघ देव मानतात) यांचे मुस्लिम लीगसोबत साटेलोटे होते. मुखर्जी यांनी स्वातंत्र्य चळवळीतील चलेजाव आंदोलनाला विरोध केला होता. भाजपच्या ‘देव’ मानल्या जाणाऱ्या नेत्यांनी मुस्लिम लीगसोबत तीन ठिकाणी सरकार स्थापन केले होते (सेंट्रल प्रोविन्स आणि इतर तीन ठिकाणी), आणि हेच त्यांचे राजकारणातील जन्मदाते आहेत. हे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवणार, असा ठाकरे यांनी केला.