हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, गहुंजेसह सात गावांबाबत आठवड्यात मोठा निर्णय

0
2

पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेला लागून असलेली गहुंजे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, माण, नेरे, सांगवडे ही सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मागील दहा वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. येत्या आठवड्यात त्याबाबतची अधिसुचना निघणार असल्याचे समजते. दरम्यान, आता या सर्व गावांसह नव्यानेच वार्डरचना करावी लागणार आणि महापालिका निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता वाढली आहे.

या गावांना कचरा, पाणी, सांडपाणी वाहिनी, वाहतूक कोंडीसह इतर समस्या भेडसावत आहेत. या भागाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी राज्य शासनाने याबाबत तत्काळ निर्णय घेण्याची मागणी महापालिकेची आहे. परंतु, अद्यापही निर्णय झाला नाही. सात गावांचा समावेश नेमका कशामुळे रखडला असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मनावर घेतला आणि त्याबाबतचे सुतोवाच नुकतेच केले होते.

पिंपरी-चिंचवडची वाटचाल गाव ते महानगर अशी झाली आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी ही गावे मिळून १९७० मध्ये नगरपालिका अस्तित्वात आली. लगतची काही गावे समाविष्ट करून १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आली. १९९७ मध्ये आणखी १८ गावे समाविष्ट केली. २००८-०९ मध्ये ताथवडे गावाचा समावेश केला. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार असताना शहराला लागून असलेल्या हिंजवडीसह सात गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सभेत फेब्रुवारी २०१५ मध्ये मंजूर करण्यात आला. त्यानंतर तो मंजुरीसाठी जून २०१५ मध्ये शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत निर्णय झाला नाही. त्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे आहे. सन २०२० मध्ये पुणे महापालिकेची हद्दवाढ झाली.

महापालिकेत समाविष्ट होण्यावरून या गावांमधील नागरिकांचे एकमत होत नाही. दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायतीवर ताण येत आहे. महापालिकेत गावे समाविष्ट केली जात नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अस्ताव्यस्तपणे बांधकामे वाढत आहेत. नागरीवस्ती वाढत असल्याने घनकचरा व्यवस्थापनावर ताण वाढला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला व महापालिका हद्दीत कचरा फेकला जात आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. सक्षम सांडपाणी व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी साचून दुर्गंधी सुटते. रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. त्याचा ताण अप्रत्यक्षरीत्या महापालिकेवर पडत आहे. सीमेवरील भागातील विद्रुपीकरण थांबविण्यासाठी तसेच, नियोजनबद्ध विकासासाठी महापालिकेची यंत्रणा असणे आवश्यक असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे ही गावे तत्काळ समाविष्ट होणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. याबाबत सातत्याने राज्य शासनाला स्मरण पत्र पाठविण्यात येते.

देहू, आळंदीचा समावेश वगळला
पिंपरी-चिंचवड महापालिकेत देहू व आळंदी हे तीर्थक्षेत्र तसेच, चाकण एमआयडीसीचा काही भाग समाविष्ट करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. मात्र आळंदी व चाकणमध्ये नगरपरिषद असल्याने समावेश झाला नाही. त्यानंतर देहू ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. त्यामुळे देहूगावही वगळण्यात आले. सुधारित प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला आहे. तसेच, चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे ही गावेही वगळण्यात आली आहेत, असे समजते.

शहराचे १८१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ
पिंपरी-चिंचवड शहराचे सध्याचे क्षेत्रफळ १८१ चौरस किलोमीटर आहे. गहुंजे ५.०५ चौरस किलोमीटर, जांबे ६.३७ चौरस किमी, मारुंजी ६.५५ चौरस किमी, हिंजवडी ८.३३ चौरस किमी, माण १९.०५ चौरस किमी, नेरे ५.३२ चौरस किमी आणि सांगवडे ३.४४ चौरस किमी असे एकूण ५४.११ चौरस किलोमीटर या गावांचे क्षेत्रफळ आहे. या गावांचा समावेश झाल्यानंतर शहराचे क्षेत्रफळ २३५.११ चौरस किलोमीटर होईल.