सावधान! पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ

0
31

पिंपरी दि. २४ –
पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसेच धरण क्षेत्रात विशेषत: घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश दिले असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनदेखील आयुक्त सिंह यांनी केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांवर क्षेत्रीय कार्यालयनिहाय समन्वय ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे क, इ आणि फ क्षेत्रीय कार्यालय, विजयकुमार खोराटे यांच्याकडे ड, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालय तर चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. नदीकाठी बचाव कार्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, शीघ्र प्रतिसाद पथकांनी दक्ष रहावे, वैद्यकीय पथक सज्ज ठेवावे, मध्यवर्ती नियंत्रण कक्षाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष राहून त्यांच्या अखत्यारीतील जबाबदारी समन्वयाने पार पाडावी, असे निर्देश देखील आयुक्त सिंह यांनी दिले.
आवश्यकता पडल्यास तात्काळ मदतीसाठी लष्कर आणि एनडीआरएफला शहरात पाचारण करण्यासाठी पूर्वसूचना देण्याबाबत आपत्कालीन विभागाला सूचना दिल्या आहेत. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर ज्या भागात पाणी शिरते त्या भागातील नागरिकांना पाणी पातळीबद्दल प्रत्यक्ष तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे सतर्क राहण्याबाबत तात्काळ सूचना द्यावी, आपत्कालीन प्रसंगी पूरबाधितांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करावे, धरण कक्ष तसेच पोलीस यंत्रणेसमवेत समन्वय ठेवावा, आदी सूचना आयुक्त सिंह यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. निवारा केंद्रासाठी समन्वयक म्हणून स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून त्यांना आवश्यक सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता बाळगावी, नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर पाऊस सुरू असून धरणे देखील पुरेशी भरली असल्याने धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी सतर्क रहावे, प्रशासनातर्फे नागरिकांना तात्पुरते स्थलांतरीत होण्याचे आवाहन करण्यात आल्यास त्यास प्रतिसाद द्यावा. नदीपात्राजवळ जाऊ नये, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून प्रशासनाची मदत व बचाव पथकेही आवश्यक उपकरणासह सज्ज ठेवण्यात आली आहेत.