साडेबारा टक्के जमीन परताव्याचा विषय खासदार बारणे यांनी मार्गी लावला – शंकरराव पांढरकर

0
138

आकुर्डी, दि. 6 एप्रिल – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देऊन न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे. त्याची जाणीव ठेवून हजारो शेतकरी मतदान करतील, असा विश्वास आकुर्डीतील ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक शंकरराव पांढरकर यांनी व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) आकुर्डी परिसरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली. बारणे यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, शिवसेना मावळ तालुका संघटक सुनील तथा मुन्ना मोरे, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, कैलास कुटे, सुनील कदम, देहूगाव शहर प्रमुख सुनील हगवणे आदी पदाधिकारी होते.

खासदार बारणे यांनी ज्येष्ठ नेते शंकरराव पांढरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी त्यांचे पुत्र माजी नगरसेवक निलेश पांढरकर तसेच परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. प्राधिकरणग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परताव्याचा प्रदीर्घकाळ प्रलंबित असलेला विषय मार्गी लावल्याबद्दल पांढरकर यांनी बारणे यांना विशेष धन्यवाद दिले. पांढरकर परिवाराच्या वतीने खासदार बारणे यांचा सत्कारही करण्यात आला.

आकुर्डी दौऱ्यात खासदार बारणे यांनी माजी नगरसेविका ॲड. उर्मिला काळभोर, हरिभाऊ काळभोर, सुनील उर्फ पप्पू कदम, भाजपाच पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे, गोपाळ नाना कुटे, मंगेश उत्तम कुटे, वासुदेव काळभोर, सचिन काळभोर, दिलीप पांढरकर, झीशान सय्यद, वैशाली काळभोर आदींची भेट घेतली व त्यांच्याशी लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा केली. सर्व ठिकाणी बारणे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले तसेच सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

आकुर्डी येथील प्राचीन विठ्ठल मंदिरा सह खासदार बारणे यांनी भेट दिली. मंदिराचे विश्वस्त गोपाळ नाना कुटे यांनी त्यांचे स्वागत केले. आकुर्डी येथील खंडेराया भाजी मंडईला भेट देत खासदार बारणे यांनी तेथील बाजीविक्रेत्यांशी संवाद साधला. त्यावेळी मंडईचे अध्यक्ष माणिक सुरसे तसेच लतीफभाई, तानाजी जगताप यांनी त्यांचे स्वागत केले.