पिंपरी, दि. २४ – संत गाडगेबाबा महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त माध्यम क्षेत्रातील तसेच माध्यमाशी निगडित सर्व प्रवाहातील व्यक्ती, संस्था, संघटना आणि अभ्यासकांसाठी विशेष व्याख्यान व संवाद चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईचे ख्यातनाम अभिनेते, लेखक, नाटककार, दिग्दर्शक आणि वक्ते मंजुल भारद्वाज यांनी ‘पत्रकार तुम्ही, आम्ही, आपण सर्व’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर होते.
व्याख्यान देताना मंजुल भारद्वाज यांनी पत्रकारितेच्या मूळ मूल्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “सत्य शोधणारा आणि सत्यासाठी जगणारा म्हणजे पत्रकार. चिकित्सा करणे म्हणजे पत्रकारिता होय. गॅलिलिओ सारखा स्पष्ट भूमिका मांडणारा तुमच्यामध्ये जिवंत आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. बातमीदारीच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, जर ३०० शब्दांमध्ये बातमी करायची असेल, तर त्यातील २९० शब्द मालकाचे आणि १० शब्द सत्याचे व स्वतःचे असावे. “जे निर्माण करतो ते विचार आणि जो विध्वंस करतो तो विकार,” असेही त्यांनी नमूद केले. ६ डिसेंबर १९९२ च्या बाबरी मज्जिद घटनेवर आपले मत मांडताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या भूमिकेवर भाष्य केले.
सत्तेला प्रश्न विचारणाराच खरा पत्रकार – अविनाश चिलेकर
अध्यक्षीय भाषणामध्ये ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी सांगितले की, सत्तेला प्रश्न विचारणारा आणि जाब विचारणारा हाच खरा पत्रकार आहे. सामान्य जनतेला न्याय कुठे मागावा हा प्रश्न पडतो, कारण लोकशाहिचे चारही स्तंभ पोखरलेले आहेत. न्यायालयांवरचा विश्वास डळमळीत झाला आहे तर राज्यकर्त्यांची विश्वासार्हता शून्यावर आली आहे. अशा परिस्थितीत माध्यमांची जबाबदारी मोठी आहे. सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर भारताचे ‘नेपाल’ होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया विकला गेल्याचे दिसत असताना, त्याला पर्याय म्हणून प्रत्येकाने सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी पत्रकार विजय जगताप, विशाल जाधव, मुजफ्फर इनामदार, दादाराव आढाव, विकास कडलक, अविनाश कांबीकर, दिलीप देहाडे, विकास साळवी आणि निलेश सायंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रताप गुरव, मारुती भापकर (माजी नगरसेवक),शरद जाधव, अनिल सूर्यवंशी, नरेंद्र सोनटक्के, रवींद्र दुधेकर, वसंत साळवी, प्रल्हाद कांबळे, विजय गायकवाड आणि विष्णू मांजरे हे सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय संत साहित्य अभ्यासक विजय बोत्रे यांनी करून दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार विजय जगताप आणि विशाल जाधव यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन पत्रकार विशाल जाधव यांनी केले.
निषेध: कार्यक्रमाच्या शेवटी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा उपस्थितांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.











































