“सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ” – देवेंद्र फडणवीस

0
181

नागपूर, दि. १० (पीसीबी) – ‘द केरला स्टोरी’ चित्रपट वादग्रस्त ठरला आहे. भाजपाकडून या चित्रपटाचं जोरदार समर्थन होत आहे, तर विरोधकांकडून हा राजकीय स्वार्थासाठी द्वेष पसरवणारा चित्रपट असल्याची टीका होत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांबरोबर जाऊन हा चित्रपट पाहिला. ‘द केरला स्टोरी’ पाहिल्यावर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (१० मे) नागपूरमध्ये बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुलींचं शोषण करण्याचं षडयंत्र केलं जातं आहे. धर्माचा दुरुपयोग केला जातो आहे. या सगळ्या गोष्टी सत्यकथेच्या माध्यमातून बाहेर आल्या आहेत. हा चित्रपट गोष्ट सांगण्यासाठी नाही, तर जागृत करण्यासाठी आहे. यानंतर कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये म्हणून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.”

“हा चित्रपट पाहिल्यावर मी एकच गोष्ट म्हणेन की, जे लोक या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भर चौकात फाशी दिली पाहिजे असं बोलले त्यांच्या सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आली आहे, असं मी चित्रपट पाहिल्यावर म्हणेन,” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला चढवला.

“कायदा आहे आणि तो कडक करावा लागेल. मात्र, त्याबरोबर समाजाचं एक जाळं तयार करावं लागेल. कारण कायदा सगळ्या गोष्टी करू शकेल असं नाही. म्हणून जागरुकता आणणंही महत्त्वाचं आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.