दि. २ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महसूल विभागाने व्हिट्स हॉटेल (VITS Hotel) विक्रीसाठी केलेल्या लिलाव प्रक्रियेत मंत्री संजय शिरसाट यांना फायदा पोहोचवण्याच्या हेतूने बाजार मूल्यापेक्षाही कमी किमती लिलाव करून हे हॉटेल विक्री केल्याचा गंभीर आरोप केला. रेडीरेकनरनुसार या हॉटेलची किंमत 110 कोटी तर बाजार भाव मूल्य यापेक्षा अधिक असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या हॉटेलची किंमत शंभर कोटींपेक्षा अधिकची आहे. फक्त शिरसाट यांना हॉटेल विकत घेता यावं त्यासाठी हा लिलाव केला होता का? मुळ किंमतीपेक्षा कमी पैशांमध्ये हा व्यवहार झाल्यानं ही प्रक्रिया बेकायदेशीर आहे. या महोदयांकडे इतके पैसे आले कुठून? असा सवाल उपस्थित केला. आता यावर मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, गेल्या 10 दिवसापासून एक विषय चर्चेला येत आहे. माझ्या मुलाने संभाजीनगरमध्ये एक हॉटेल विकत घेतलं आहे. त्या हॅाटेलचे प्रकरण कोर्टात गेले आहे. गेली अनेक वर्ष भागधारकांचा व्यवहार रखडलेला आहे. सात वेळा लिलावाची प्रक्रिया पार पडली आहे. त्यावेळी कोणी हॉटेल घेतलं नाही. आठव्या वेळी माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्राने टेंडर भरलं. त्यासाठी आवश्यक रक्कम देखील भरण्यात आली. आता हे केल्यानंतर मूर्खासारखे काही जण स्टेटमेंट करू लागले. मुळात ज्यावेळी व्यवहार पूर्ण होईल त्यानंतर बोलायला पाहिजे होतं ना. मुळात ज्यावेळी हॉटेल खरेदी होईल, त्यावेळी सगळा व्यवहार हा व्हाइटमध्ये दिसेल ना. 110 कोटी रक्कम त्यांनी कुठून आणली? ६८ कोटी रुपयांचा रुपयांचा विषय आहे. आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घ्या, असे त्यांनी म्हटले.
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, संजय राऊतला एकाने चुकीचं ब्रिफिंग केलं, त्यांना लक्षात आलं चुकीचे आरोप केले आहेत. मी तुम्हाला आव्हान देतो की, 100 कोटी रुपयांचे हॉटेल आहे ना. मी 68 कोटी रुपयांना विकत घेणार होतो. मी आज माझ्या मुलाला सांगतो त्यातून बाहेर पडा. आता पुन्हा नवीन टेंडर निघत आहे. 100 किंवा 90 कोटी रुपयांना भरा तुम्ही, 100 कोटी रुपयांचे हॉटेल असेल तर तुम्हालाच फायदा होईल ना, असेही त्यांनी म्हटले.
उद्या माझा मुलगा या टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडतोय. व्यवसायासाठी उभ्या राहणाऱ्या व्यक्तीच्या कामात संजय राऊत तुम्ही खोडा घातला आहे. मराठी माणूस उभा राहत होता. मात्र, तुम्ही ते होऊ दिलं नाही. तुम्ही वैयक्तिक जात असाल तर मला सुद्धा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जावं लागेल. कारण, तुमच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. मी सुद्धा सगळ्या गोष्टी काढेन. संजय राऊत लक्षात ठेवा, मी थोडा चक्रम माणूस आहे. घराला आग लावायला कमी करणार नाही. संजय राऊतला ब्रिफिंग कुणी केलं ते चुकीच केलं आहे. केवळ संजय शिरसाट नाव येत आहे, त्यामुळे संजय राऊत यांनी बोंब मारायला सुरुवात केली आहे, अशी टीका देखील त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली.