“शिवाजी महाराजांनी राष्ट्रवाद रुजवला!” – पांडुरंग बलकवडे

0
182

पिंपरी,दि. २१ (पीसीबी) – “छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात राष्ट्रवाद रुजवला!” असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी ‘शिवराज्याभिषेकाचे महत्त्व’ या विशेष चर्चासत्रात बोलताना ना. धों. महानोर साहित्यनगरी (जयगणेश बँक्वेट हॉल), नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दोन दिवसीय दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज श्रीमंत रघुजीराजे आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कान्होजीराजे जेधे यांचे वंशज दिग्विजय जेधे यांनी, “बालवयात ऐतिहासिक पुस्तके वाचनाचा छंद होता. वाचनातून छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याशी आमच्या पूर्वजांचा कौटुंबिक जिव्हाळा होता, ही बाब मला इतिहासात आवड निर्माण करणारी ठरली. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याकडून महाराजांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे सार्वभौम असे स्वराज्य जनतेला मिळाले!” अशी भावना व्यक्त केली.

पांडुरंग बलकवडे पुढे म्हणाले की, “केंद्रीय विद्यालयाच्या शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाला अतिशय नगण्य स्थान दिले आहे. त्यातही दुर्दैवाची बाब अशी की, जिजाऊ माँसाहेब, संभाजीराजे आणि राजारामराजे यांचा त्यात नामोल्लेखदेखील नाही. पुन्हा रामराज्य निर्माण व्हावे या उद्देशाने जिजाऊंनी स्वराज्याची संकल्पना मूर्त स्वरूपात आणली. शिवराज्याभिषेकामुळे अनेक शतकांनंतर या देशात राष्ट्रवाद रुजवला गेला!”

अध्यक्षीय मनोगतातून रघुजीराजे आंग्रे यांनी, “हिंदू किंबहुना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला जात होता, अशा निर्नायकी अवस्थेत स्वातंत्र्याची, स्वराज्याची निकड जिजाऊ माँसाहेबांना भासली. शिवराज्याभिषेकाची तुलना केवळ रामराज्याभिषेकाशी केली जाऊ शकते. त्या ऐतिहासिक घटनेमुळे हजारो वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती घडली होती. त्यामुळे शिवराज्याभिषेक हा फक्त एक सोहळा नव्हता; तर तिमिरातून तेजाकडे ती वाटचाल होती. हिंदवी अन् पर्यायाने मराठी राजसत्ता ही पातशाह्यांबरोबरच ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांना ठणकावणारी सार्वभौम शक्ती होती. मराठे जिथपर्यंत पोहोचले तोच भूभाग आज हिंदुस्थानात राहिला आहे!” असे विचार मांडले.

या विशेष चर्चासत्रासाठी संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, समन्वयक अरुण बोऱ्हाडे, विशाल सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी आभार मानले.