शिवसेनेच्या खासदारांची गुप्त बैठक, पुन्हा मोठ्या भूकंपाचे संकेत..

0
269

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : शिवसेनेचे १५ खासदार फुटीच्या मार्गावर आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असतानाच १० खासदारांची बैठक झाल्याची माहिती आहे. खासदार कृपाल तुमाणे यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक झाली. काल झालेल्या या बैठकीला १० खासदार उपस्थित होते. एवढंच नाही तर एक भाजपचा ज्येष्ठ नेताही या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. शिवसेना खासदारांनी दिल्लीत डिनर डिप्लोमसी करत उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. ४० आमदारांनी बंड केल्यानंतर आता १५ खासदार भाजपा बरोबर जावे अशी आग्रही मागणी करु लागल्याने शिवसेनेत खळबळ आहे. संजय राऊत यांना टाळून खासदार कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी
१० खासदारांची बैठक झाल्याने पुन्हा मोठा भूकंप होणार असे दिसते.

शिवसेना खासदार भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला होता. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. पत्रात एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्याकडे असणारे लोकसभेतील प्रतोद पद काढून घेतले. एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर शिवसेना सावध झाली आहे. तसेच कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत. त्यामुळे ते त्यांच्यासोबत आहेत.
शिवसेनेकडून आता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत राजन विचारे यांची लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भावना गवळी यांना लोकसभा प्रतोदपदावरून हटविण्यात आले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे.
आनंद आडसूळ यांची शिंदे भेट महत्वाची –
दुसरीकडे शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ईडी मुळे त्रस्त असलेले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याचं पत्र पाठवून दिलं आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना आनंदराव अडसूळ यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. दरम्यान, ते एकनाथ शिंदे गटात दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना शिवसेनेकडून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली असून आता आढळराव पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आढळराव यांचे शिरूर मतदारसंघात मोठे वजन आहे. तीन वेळा शिवसेनेचे खासदार राहिल्याने तसेच आताचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरच नाराजी वाढत चालल्याने पुन्हा २०२४ मध्ये आढळराव यांना मोठी संधी आहे.
दरम्यान, पक्षातून हकालपट्टी झाल्याच्या वृत्ताने अस्वस्थ झालेले आढळराव-पाटील यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले आहे. या नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटील भेटीसाठी बोलावलं होतं आणि या भेटीत आढळराव पाटील यांना ही ऑफर दिल्याचं बोललं जात आहे.