शिवरायांच्या चरणी डोके ठेवतो आणि शंभर वेळा माफी मागतो… मुख्यमंत्री शिंदे

0
33

मुंबई, दि. 29 (पीसीबी) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असणारा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला होतो. त्यासंदर्भात राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुती सरकारमधील घटकपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच माफी मागितली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माफी मागितली आहे. या प्रकरणात राजकारण करु नका, लवकरात लवकर भव्य पुतळा कसा उभारला जाईल, त्यासाठी पाठपुरावा करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना केले आहे.

राजकारण करण्यास अनेक विषय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपली सर्वांची अस्मिता आहे. आपले दैवत आहेत. त्यावर कृपया करुन राजकारण करु नका. मी त्यांच्या चरणावर डोके ठेवून एकदा नाही तर शंभर वेळा माफी मागतो. त्यांचा आदर्श ठेऊनच आम्ही राज्याच्या कारभार करत आहोत. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी विरोधकांना सुबुद्धी द्यावी. त्यांनी या विषयात राजकारण आणू नये, असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर कसा उभा राहील, यावर विरोधकांनी सांगितले पाहिजे. किल्ल्याचा परिसर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर संरक्षित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी संरक्षित केले जाणार आहे. नौदलास त्या ठिकाणी काम सुरु करायचे आहे. बुधावारी आम्ही बैठक घेतली. त्यासाठी दोन समित्या नियुक्ता केल्या आहेत. त्यात आयआयटीचे इंजिनिअर, नौदलाचे अधिकारी आणि इतर लोक असणार आहे. त्या ठिकाणी लवकरच लवकर भव्य पुतळा उभारण्याचे काम केले जाईल.