शिंदे- फडणवीस-पवार यांनी राज्याच्या राजकारणाची गटारगंगा केली …

0
149

सोलापूर, दि. ०४ (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केली आहे. या गटार गंगेविषयी मी अधिक बोललो तर माझी जीभ विठळेल, असं राजू शेट्टी म्हणालेत. सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी मेळावा काल संध्याकाळी पार पडला. त्यानंतर राजू शेट्टी यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी सध्याच्या राजकारणावर त्यांनी भाष्य केलं. शिंदे सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरु आहे. याबाबत तुमचं मत काय असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सत्ताधारी गटातील एकही आमदार दारात उभा करण्याच्या लायकीचा नाही, असं राजू शेट्टी म्हणाले. आम्ही कुणाच्या ही भानगडीत न पडत नाही. शेतकऱ्यांसाठी काम करतो. येत्या काळातही शेतकऱ्यांची बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी तयार करण्याचा आमचा मानस आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या निवडणुकीत बदल घडवेल. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी तयार करेन, असंही त्यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन वेळा भेटलो. पण काहीही उपयोग झाला नाही. कारखान्याच्या गोदामातील साखरदेखील बाहेर येऊन देणार नाही.कोल्हापुरात साखर अडवली जाऊ लागली आहे. आता आम्ही रस्त्यावरच्या लढाईला सुरुवात करणार आहोत. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत वापरु देणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.
ऊसाचा दुसरा हप्ता मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राजू शेट्टी यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. ऊसाची रिकव्हरी तपासणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमध्ये पवार लॉबी पाहायला मिळतेय. साखर कारखानदारच विश्वस्त आहेत. मग कसा कारभार होईल? सगळे साखर कारखानदार दरोडेखोरच आहेत. शेतकऱ्यांचा घामाचा पैसे खाऊन कारखानदारांकडे एवढा पैसा आला कुठून? मागचा हिशोब साखर कारखान्यांनी पूर्ण केल्याशिवाय ऊसाचं एक टिपरु देखील तोडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.