विधानसभा थेट डिसेंबरमध्ये, लाडकी बहीण आली आडवी

0
48

मुंबई, दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) – विधानसभा निवडणूक २०२४ लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान होऊन निकाल लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात विधानसभेचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळत आहेत. दरवेळी प्रमाणे विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात न होता, दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता याआधी वर्तवली जात होती. परंतु आता डिसेंबर उजाडण्याची चिन्हं व्यक्त केली जात आहेत. याला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना कारणीभूत असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, विधानसभेनंतर महापालिका निवडणुका किमान फेब्रुवारी-मार्च मध्ये होतील असा अंदाज होता, आता त्यासुध्दा आणखी सहा महिने पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

खरं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २६ नोव्हेंबर २०२४ पूर्वी पार पडणे अपेक्षित आहे. मात्र यंदा मुदत संपल्यानंतर निवडणुका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर टाकली जातेय का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कारण नुकताच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या योजनेचा पहिला-दुसरा हफ्ता बहिणींना मिळाला. मात्र आणखी किमान दोन हफ्तेही द्यावेत, अशी सरकारची भावना आहे. म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे आणखी सहा हजार कुठल्याही आचारसंहितेत न अडकता लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचावेत आणि अधिकाधिक महिला मतदार आकर्षित व्हाव्यात, असा सरकारचा प्लॅन असल्याचे बोलले जाते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. जम्मूतील मतदानानंतरच महाराष्ट्रात निवडणुका होण्याचे संकेत आयोगाने दिले आहेत. पाऊस, याशिवाय गणपती, पितृपक्ष, नवरात्र, दसरा अशा सण उत्सवांमुळे जम्मूसोबत निवडणुका घेत नसल्याचं आयोगाने म्हटलं आहे. म्हणजेच चार ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर आठवडाभराचा अवधी तरी घोषणेसाठी दिला जाईल. निवडणुकांच्या घोषणेनंतर ४५ दिवसांचा कालावधी मिळतो. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरच्या टप्प्यात आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज आहे.खरं तर सप्टेंबरच्या तिसऱ्या महिन्यात निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक लागल्यास आतापासूनच प्रचाराचा नारळ वाढवावा लागेल. पावसाळा अद्याप ओसरलेला नाही. याशिवाय, श्रावण, गणपती, पितृपक्ष, नवरात्र, दसरा-दिवाळी असे एकामागून एक सणावाराचे दिवस आहेत. या काळात विधानसभा निवडणूक नसाव्यात, अशी बहुतांश राजकीय नेते आणि पक्षांची धारणा आहे.
अनिश बेंद्रे