वाढत्या महागाई वरून खासदार सुप्रिया ताई सुळे आक्रमक

0
147

मुंबई दि. २९ (पीसीबी) – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढत्या महागाई आणि घरगुती वापराच्या गॅसवर आलेल्या बंधनावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. देशवासियांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातील भाजपसरकारने थेट नागरिकांच्या जेवणावर, सण – उत्सव साजरे करण्यावर आणि एकंदरीत मुलभूत हक्कांवरच बंधन घातले आहे. आता सण उत्सव बंधणं घालूनच साजरे करावे लागणार आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या निर्णयाचा एक गृहिणी म्हणून सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेधही केला आहे.

दरम्यान ऐन नवरात्रौत्सवात देशातील महिलांच्या हिताचा निर्णय घेण्याऐवजी मोदीसरकारने गृहिणींच्या चिंतेत आणखी भर घालण्याचं काम केलंय. एकीकडे एलपीजी गॅस सिलेंडर दरात भरमसाठ वाढ करायची आणि दुसरीकडे गॅस सिलेंडर वापरावर मर्यादा आणायची, यातून केंद्रसरकार किती असंवेदनशील आहे हेच दिसून येते, असा जोरदार हल्लाबोलही सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केला आहे.

केंद्राच्या नव्या नियमानुसार उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी नसलेल्या ग्राहकाला वर्षभरात केवळ 15 गॅस सिलिंडर मिळणरा आहेत. अनुदानित असलेल्या ग्राहकाला 12 तर दोघांसाठीही महिन्याचा कोटा 2 सिलेंडरचा करून मोदीसरकारने प्रत्येक गृहिणीच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. ही बातमी वाचण्यात आली व अक्षरशः धक्काच बसला, असं त्या म्हणाल्या.

दुसरीकडे एखाद्या ग्राहकाला जर गॅस सिलेंडरची आवश्यकता असल्यास त्यासाठी गॅस सिलेंडर कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. तसेच त्याचा पुरावा देऊन, त्यासाठी कागदपत्रे सादर करून त्यानंतरच त्या ग्राहकाला अतिरिक्त रिफिल मिळू शकेल. एकीकडे ‘ई-गव्हर्नन्सचा’ गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे अतिरिक्त गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी पुन्हा नागरिकांना कागदपत्रे घेऊन खटाटोप करायला लावायचा यातून केंद्रसरकारची कार्यपध्दती किती कुचकामी आहे, हेच पाहायला मिळते असा आरोपही त्यांनी केला आहे.

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर केंद्रसरकारने हा निर्णय घेऊन समस्त महिला वर्गाची अक्षरशः चेष्टाच केली आहे. संसाराचा रहाटगाडा चालवायचा कसा असा प्रश्न आता माझ्यासह देशातील अनेक गृहिणींना पडलाय, असं त्या म्हणाल्या.

देशात मोठ्या प्रमाणावर सण उत्सव साजरे केले जातात. या सणासुदीत विविध पक्वान्न, खाद्यपदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. त्यामुळे घराघरात या काळात गॅस सिलेंडरची सर्वाधिक आवश्यकता असते. परंतु केंद्राच्या केवळ 15 सिलेंडरच घेण्याच्या नियमामुळे देशवासियांना मर्यादेमध्ये गॅस सिलेंडर वापरावा लागणार असून आपले सण उत्सव हे बंधन घालूनच साजरे करावे लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी भीतीच त्यांनी व्यक्त केली.

केवळ सण उत्सवच नव्हे तर अनेक महिला या घरगुती डबे पुरवण्याचे काम करतात किंवा अनेक विद्यार्थी पेईंग गेस्ट किंवा समूहाने राहतात. अशांसाठी गॅस सिलेंडरची जास्त आवश्यकता असते. परंतु या निर्णयाने महिला, विद्यार्थी व पेईंग गेस्टसारख्या सर्वांनाच चिंतेत टाकण्याचे काम मोदीसरकारने केले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.