रेड्यांच्या मतांवर निवडून आलेला ‘महारेडा’

0
205

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : आदल्यादिवशी आमची मते घेतली, त्यांना निवडून आणलं आणि दुसऱ्यादिवशी आम्ही रेडे कसे झालो. मुळात रेड्यांच्या मतांवर निवडून आलेला कोण तर ‘महारेडा’ असतो, असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना लगावला. दरम्यान, शिवसेना बंडखोर आणि निष्ठावंत गटातील शाब्दिक लढाई आता टीपेला पोहचली आहे.

बंडखोरी केलेल्या आमदारांवर शिवसेनेच्या नेत्यांनी खालच्या पातळीवर टीका केली. बंडखोर आमदारांना रेड्याची, गटाराची, प्रेतांची उपमा दिली. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, रेड्यांच्या मतांवर निवडून आलेला कोण तर ‘महारेडा’ असतो. आदल्यादिवशी आमची मते घेतली, त्यांना निवडून आणलं आणि दुसऱ्यादिवशी आम्ही रेडे कसे झालो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आमचे शहाजी बापू म्हणतात की, तो महारेडा आहे. पण, ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांना त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. माझी आदित्य ठाकरेंना व उद्व साहेबांना विनंती आहे. त्यांनी संजय राऊतांची भाषा शिकू नये. त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन राहावे. शिवसेनेचे नेमके काय चुकले, यावर शंभूराज देसाई म्हणाले, आमचे ऐकुणच घेतले जात नव्हते. राष्ट्रवादीच्या आहारी गेल्यासारखे त्यांचे काम झाले होते.