रिझर्व्ह बँकेचे या बँकेवर निर्बंध, पैसे काढण्यासाठी ग्राहकांंची रांग

0
14

मुंबई दि.१४ : बँकिंग क्षेत्र नियामक रिझर्व्ह बँकेने मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर अनेक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या निर्बंधानंतर, बँक ठेवीदारांना त्यांच्या खात्यात जमा केलेले त्यांचे कष्टाचे पैसे काढता येणार नाहीत. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक आता कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतीही ठेव घेऊ शकणार नाही. ही बंदी गुरुवार, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू झाली आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी, बँकेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्यामुळे, रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर अनेक बँकिंग व्यवसायाशी संबंधित निर्बंध लादले. आरबीआयच्या या कडक कारवाईनंतर, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक ग्राहकांना कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा ग्राहकांकडून ठेवी स्वीकारू शकणार नाही. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँक ठेवीदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. बँक खातेधारकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयने सध्या बँकेवर सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लादले आहेत आणि या काळात बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. सहा महिन्यांनंतर, आरबीआय बंदीच्या निर्णयाचा आढावा घेईल.
आरबीआयने म्हटले आहे की, “बँकेची सध्याची रोख स्थिती पाहता, ठेवीदाराच्या बचत बँक किंवा चालू खात्यातून किंवा इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.” तथापि, बँकेला बँक कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे आणि वीज बिल यासारख्या काही आवश्यक गोष्टींवर खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे.