राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारुन तुम्ही दाखवणार का ?

0
224

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन देशाबरोबर राज्याचं वातावरणही तापलं आहे. याच मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत स्वातंत्र्यवीर सावकरांवरुन थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा सावकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत लगावली होती, ही हिम्मत राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारुन तुम्ही दाखवणार का? असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

सावरकरांचा वारंवार अपमान
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून वारंवार सावरकर यांचा अपमान होतोय, त्याचा आम्ही निषेध करतो, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. सावरकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण सर्व घेत आहोत, देशात लोकशाही आहे. स्वांतत्र्यसैनिकांनी जो त्याग केला त्यांचा जाणीवपूर्णवक अवमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा निषेध देशभरातू होत आहे.

‘सावरकर होण्याची तुमची लायकी नाही’
राहुल गांधी यांनी सेक्युलर जेलमध्ये एक दिवस राहून आले तर त्यांना स्वातंत्र्याची जाणीव होईल, पण त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. आपल्या देशाची निंदा परदेशात जाणून करावी हा देशद्रोह आहे. आम्ही सावकरांचा अवमान करणाऱ्या वृत्तीची आम्ही निंदा करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

‘विरोधक मूग गिळून गप्प होते’
विधीमंडळाच्या अधिवेशनात राहुल गांधींविरोधात एकही शब्द बोलण्याची हिंमत विरोधकांनी दाखवली नाही. काँग्रेसच्याबरोबरीने काळ्याफितीने लावून साथ देणारे नेते आपण पाहिले. सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही बोलणाऱ्यांचे आमदार विधानसभेत मूग गिळून गप्प होते. कशासाठी तर महाविकास आघाडीसाठी. काल जाहीर सभेत बोलत होते सावकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, पण सहन करणार नाही म्हणजे काय करणार असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

भडिमार झाल्यानंतर त्यांना उशीराचं शहानपण सुचलं, हे ठरवून केलं जात आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, सावकरांच्या अपमानाविरोधात देश पेटून उठलाय. देशभक्तांविरोधात जे बोलतील त्यांच्याविरोधात महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे, सावकरांचा त्याग, त्यांची देशभक्ती या समर्पणाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर सावरकर गौरव यात्रा सुरु करणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.