राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार ?

0
564

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शरद पवारांना शह दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळंतय. अशातच आता माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसत्ताशी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, लढाईपूर्वी एकप्रकारे माघार घ्यावी लागत असल्याने स्वतः शरद पवार हे खूप अस्वस्थ असल्याचे समजते. छोटे पक्ष संपविण्याची मोदी – शाह यांची खेळी उधळून लावण्यासाठी पवार हे पाऊल उचलणार अशी चर्चा आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर आता शरद पवार आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, अशी सोशल मीडियावर चर्चा होत तरी देखील तशी शक्यता ‘लगेच’ दिसत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांना संसदीय मंडळात सामावून घेतलं जाऊ शकतं, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवारांना ऑफर दिली की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. समाजमाध्यमांवर होत असलेल्या चर्चेला त्यांनी नकार दिला नसल्याने आता सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी फार आक्रमकपणे तरुणांकडे नेतृत्व दिलं. मात्र, ते यशस्वी झाले असं म्हणता येणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीवर त्यांनी भाकित वर्तविलं आहे. आगामी काळात राज्यात काँग्रेस आणि भाजपा अशीच लढत होईल. आणि द्विपक्षिय पद्धत अस्तित्वात येईल, असंही चव्हाण म्हणाले आहेत.