रामनगर परिसरातील खाण बर्ड व्हॅलीच्या धर्तीवर विकसित करा – विशाल काळभोर

0
253

पिंपरी – रामनगर, विद्यानगर आणि दत्तनगर, शंकरनगर परिसरात जुनी खाण आहे. या खानीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. वास्तविकता खाण विकसित केल्यानंतर शहराच्या सौंदर्यात एक वेगळीच भर पडणार आहे. त्यामुळे बर्ड व्हॅलीच्या धर्तीवर रामनगर परिसरातील खाण विकसित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.

याबाबत विशाल काळभोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी महापालिकेच्या वतीने चांगले प्रयत्न केले जात आहेत. शहरातील चौका-चौकात विविध सामाजिक संदेश देणारे पुतळे बसविण्यात आले आहेत. तसेच पालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने उद्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. याच अनुषंगाने रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर परिसरात जुनी खाण असून त्याचा विकास केल्यास शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे.

शंकरनगरमधील उद्यानाकडे पालिकेच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष

एकीकडे महापालिका उद्यानाचे शहर करण्याचे स्वप्न दाखवत असतानाच रामनगर, शंकरनगर, विद्यानगर, दत्तनगर या भागातील नागरिकांसाठी फक्त एकमेव उद्यान आहे. या परिसरात 35 ते 40 हजार लोकवस्ती असताना नागरिकांच्या सोयीसाठी असलेले एकमेव उद्यानही बंद आहे. ही करदात्या नागरिकांसाठी दुर्दैवाची बाब आहे. महापालिकेने शहरातील उद्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले असतानाच शंकर मंदिर परिसरात उद्यान विकसित करून ते खुले करावे. याच परिसरात क्रीडांगण विकसित करावे. ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी जाॅगिंग ट्रॅकची व्यवस्था करावी, अशी मागणी विशाल काळभोर यांनी केली आहे.

दशक्रिया घाटाची दुरावस्था

रामनगर परिसरात दशक्रिया विधीसाठी घाटाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या घाटाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे घाटाची दुरुस्ती करून अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांसाठी पाणी, स्वच्छतागृह, शेडची व्यवस्था करावी. तसेच वृक्षारोपण करून पथदिवे बसवावेत, फुटपाथ विकसित करावेत. त्याचबरोबर दुरावस्था झालेल्या कंपाऊंड वॉलची दुरूस्ती करावी अशी मागणी विशाल काळभोर यांनी केली आहे.

याबाबत विशाल काळभोर म्हणाले की,

आकुर्डी, काळभोर नगर, रामनगर, मोहननगर, शंकरनगर, विद्यानगर, दत्तनगर या परिसरातील अनेक नागरी समस्यांबाबत आपला महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. करदात्या नागरिकांना उच्च दर्जाच्या सुविधा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. मात्र, महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. या प्रशासकीय राजवटीत नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रयत्न करावेत