दि . ६ ( पीसीबी ) – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रिकरणाच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या महिनाभरापासून केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. पण या दोन नेत्यांची भेट कधी होणार, या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज ठाकरे यांचे घर आमच्यासाठी दुसरे घर आहे, असे मोठे वक्तव्य राऊतांनी केले. त्यांनी पडद्यामागील घडामोडींवर खास संकेत दिल्याने दोन्ही गोटात काही तरी विशेष घडत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
“आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे तुम्ही हे समजून कसं घेत नाही. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढला आहे आम्ही सकारात्मक आहोत. राज ठाकरे सकारात्मक आहेत त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. अत्यंत सकारात्मक असल्यामुळे जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा झाला असेल त्याच्यामध्ये चिंतेचा कारण काय” असे राऊत म्हणाले.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत, त्यांना युती करायची असेल तर ते एकमेकांना फोन करतील, आदित्य ठाकरेकडे पण फोन नंबर आहे. ते पण राज ठाकरे, काकांना फोन करू शकतील, असे वक्तव्य काल अमित ठाकरेंनी केले होते. त्यावर आज संजय राऊत यांनी मत मांडले. या दोघांमध्ये फोन झालेही असतील. तुम्हाला फळ दिसल्याशी कारण आहे ना. युतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, असे मोठे विधान त्यांनी केले. तर संदिप देशपांडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते, असे सुतोवाच त्यांनी केले.
अमित आणि आदित्य हे जे मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्मापासून हे आधी दोन भाऊ आहेत ना मी या दोघांनाही पाहिलं आहे, असे राऊत म्हणाले. जाहीरपणे मी आता दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी उद्धव ठाकरे यांना फोन करतो असं सोशल मीडियावर सांगितल्यावर कोणी एकमेकांना फोन करत नाही फोन झाले सुद्धा असतील, असे ते म्हणाले.
तुम्हाला फळ दिसल्याची कारण आहे ना फळ झाडावरती यायला आधी बी लावावी लागते मग पाणी द्यावे लागते मग वाढवावा लागतो मग फांद्या येतात अशा अनेक प्रक्रियेतून फळ येत त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, असे मोठे संकेत राऊतांनी यावेळी दिले. मी राज ठाकरे यांच्या कॅफेमध्ये नाही मी घरी जाईन आमच्यासाठी ते कॅफे नाही आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.