राज्य सरकारकडून आनंदाचा नव्हे दुःखाचा शिधा देऊन गोरगरीबांची थट्टा – काशिनाथ नखाते

0
298

पिंपरी,दि.३०(पीसीबी) – कोणतेही प्रशासकीय नियोजन न करतासवंग प्रसिद्धीसाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा ही फसवी घोषणा केली. सरकारने गरिबांना आनंदाचा नव्हे दुःखाचा शिधा दिल्याचा आरोप कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केला.सरकारला आनंदाच्या शिधाला स्टिकर लावून प्रसिद्धी मिळवायची होती की,गरिबांची दिवाळी गोड करायची होती असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चिंचवड येथे महासंघाच्या कार्यालय प्रंगाणात कंत्राटी कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले,बांधकाम,घरेलू कामगार सफाई कामगार कष्टकऱ्यांचा दिवाळी मेळावा नुकताच पार पडला. यावेळी नटराज कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश स्वामी, राजेश माने,सिद्धनाथ देशमुख,निरंजन लोखंडे, माधुरी जलमुलवार,वृषाली पाटणे,प्रियांका काटे, सुनीता दिलपाक,सीमा शिंदे, वैशाली इजगज, सुनीता पोतदार, कलावती पाल, अर्चना कांबळे, वहिदा शेख, लता गोरे, विजया पाटील, मनीषा हाके, नंदा तेलगोटे, जरिता वठोरे आदी उपस्थित होते.

काशिनाथ नखाते म्हणाले, गोरगरिबांची दिवाळी स्वस्तात आणि उत्साहात साजरी म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने ‘आनंदाचा शिधा’ रेशनकार्ड धारकांना देण्याची मोठा गाजावाजा करून घोषणा केली. दिवाळी सणासाठी 100 रुपयात रवा,साखर, पामतेल,चना डाळ चार वस्तू मिळणार या आशेने पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यातील लाखो कार्ड धारक रेशन दुकानात गेले. तेव्हा त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले आहे. कोणतेही प्रशासकीय नियोजन न करतासवंग प्रसिद्धीसाठी सरकारने ही फसवी घोषणा केली. त्यातही मंत्री दीपक केसरकर म्हणातात तुळशीच्या लग्नापर्यंत शिधा पोहोचेल अशाने
गोरगरीबांना दुःखाचा शिधा देऊन क्रूर थट्टा केली.यंदा सामाजिक संस्था , संघटनानी सामान्य व कष्टकरी कामगारांच्या दिवाळी साठी पुढाकार घेऊन शिधा , फराळ वाटप केला. अन्यथा सरकारच्या भरवशावर उपाशीच राहिले असते. काही दुकानात अर्धवट शिधा उपलब्ध आहे .दोन वस्तू आल्या दोन नाही.

महेश स्वामी म्हणाले, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा मात्र आता कष्टकरी ,वंचित येती घरा तोची दिवाळी दसरा हे वचन कष्टकरी महासंघाने प्रत्यक्षात आणली. उपेक्षियांसोबत अनेक वर्षांपासून दिवाळी साजरी करून सुख दुःख वाटून घेण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. प्रास्ताविक यासीन शेख यांनी तर आभार किरण साडेकर यांनी मानले.