रवींद्र वायकर यांच्यावर ईडी चा छापा

0
220

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र वायकर यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी ) धाड टाकली आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी सुमारास रवींद्र वायकर यांच्या घरी धाड टाकली. ईडीच्या पथकात १० ते १२ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं रवींद्र वायकर यांच्या घरी टाकल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास ईडीचं पथक रवींद्र वायकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर ईडीच्या १० ते १२ जणांच्या पथकानं झाडाझडती सुरू केली आहे. तसेच, वायकरांशी संबंधित सात ठिकाण्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

“उद्धव ठाकरेंनी जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण दाबलं”
याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे आणि त्यांचे पार्टनर रवींद्र वायकर, अनिल परब, संजय राऊतांनी करोनात फक्त कमाई करण्याचं पाप केलं. जुलै २०२१ मध्ये उद्धव ठाकरेंनी गैरमार्गानं रवींद्र वायकरांना जोगेश्वरी येथे २ लाख स्क्वेअर फूटांचं अनधिकृत हॉटेल बांधण्याची परवानगी दिली. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रकरण दाबलं,” असा आरोप किरीट सोमय्यांनी केली आहे.

“हिशोब तर द्यावा लागणार”
“रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे पार्टनर आहेत. अलिबागमधील १९ बंगल्यांचा घोटाळाही रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरेंनी संगनमताने केला आहे. नोटंबदीतही वायकरांनी हात धुवून घेतला होता. हिशोब तर द्यावा लागणार,” असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं.