मोदींचा कंठ दाटला, म्हणाले… मलाही लहानपणी अशा घरात राहता आलं असतं तर…

0
121

सोलापूर, दि. १९ (पीसीबी) – आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गरीबांना घरं उपलब्ध करुन देण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी विठ्ठलाला नमन करत आणि सिद्धेश्वराला नमन करत केली. महाराष्ट्र राममय झाला आहे याचा मला आनंद आहे असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच आज एक लाखापेक्षा जास्त लोकांना घर मिळत आहे त्यामुळे आनंद होतो आहे असंही मोदी म्हणाले.

गरीब कुटुंबांना रामज्योती प्रज्वलित करण्याचं आवाहन
महाराष्ट्रातले एक लाखांहून अधिक गरीब कुटुंब ही आपल्या पक्क्या घरांमध्ये रामज्योती प्रज्वलित करतील याचा मला विश्वास आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोबाइलचा फ्लॅश सुरु करुन संकल्प करण्यासही त्यांनी सांगितलं. आज महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये होणाऱ्या दोन हजार कोटींच्या प्रकल्पांचाही शुभारंभ झाला आहे. मी त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो.

पंतप्रधान मोदी भावूक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं ते म्हणाले मोदींमुळे महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे. हे ऐकून तर खूप चांगलं वाटतं. मात्र वास्तव हे आहे की महाराष्ट्राचा गौरव वाढतो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि इथल्या प्रगतीशील सरकारमुळे होतो आहे. प्रभू रामाने आम्हाला नेहमी वचनपूर्तीची शिकवण दिली आहे. मला आज खूप आनंद होतो आहे की सोलापूरमधल्या गरीबांसाठी आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण झालं आहे. मी ते काम पाहिलं तेव्हा वाटलं मलाही लहानपणी अशा घरात राहता आलं असतं तर किती छान झालं असतं असं वाटलं. आज मी जेव्हा या गोष्टी पाहतो, तेव्हा मनात खूप आनंद होतो. हजारो कुटुंबांची स्वप्न जेव्हा साकार होतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद माझी सर्वात मोठी पुंजी असतात असं म्हणताना मोदींना अश्रू अनावर झाले.

मी जेव्हा या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं तेव्हाच तु्म्हाला गॅरंटी दिली होती की तुमच्या घरांच्या चाव्या देण्यासाठीही मी स्वतः येईन. आज मी माझं वचन पूर्ण केलं आहे आणि याचा मला खूप आनंद आहे असंही मोदी म्हणाले. मोदीची गॅरंटी म्हणजे वचनपूर्ती असंही मोदी म्हणाले आहेत. इतके दिवस गरिबी हटावचा नारा दिला जात होता. पण गरिबी हटली नव्हती. मी अहमदाबादमध्ये राहिलो आहेत. ती देखील कामागारांची भूमी आहे. पद्मशाळी कुटुंबांनी मला कधीही उपाशी ठेवलं नाही. सोलापूरमधल्या एका गृहस्थांनी मला विणलेलं एक चित्र पाठवलं होतं ती आठवणही आज मोदींनी आपल्या भाषणात सांगितली.

आमची निष्ठा देशाप्रती आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवायचं आहे. गरिबी हटओचे नारे दिले जात होते. मात्र हे घोषणा देऊन होत नाही. आम्ही त्यासाठी काम केलं. मधल्या दलालांना आम्ही हटवण्याचं काम केलं. त्यामुळे आम्ही थेट कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करु शकलो.