मोठी बातमी – नगरपालिका निवडणुका रद्द होणार ?

0
220

– ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा सरकारचा विचार

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर नगरपालिका, ग्रामपंचायत प्रस्तावित निवडणुका पुढं ढकलल्या जाणार आहे. भाजपाने शुक्रवारी त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत अशी मागणी भाजपाने लावून धरली आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या निवडणुका जाहिर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुका ६ महिने पुढं ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. जाहीर झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नये यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. पावसाळ्यात निवडणुका घेऊ नये यासाठी निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पावसाळ्यात कर्मचा-यांची कमतरता भासते. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आपला गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा पुनरूच्चार पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे जाण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्षष्ट केलं. मात्र न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याच नमूद करत त्यांनी सूचक इशाराही दिला आहे.