मुंबई, दि. ६ (पीसीबी) : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा जोर धरत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत दोनवेळा ठाकरे बंधु एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तर, यंदा उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन त्यांचा शुभेच्छा दिल्याने महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-मनसेची युती होणारच, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून मुंबईतील बेस्टच्या पतपेढीसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची (MNS) युती झाली आहे. दोन्ही पक्षाच्या युतीचे पॅनेल येथे निवडणुकीच्या मैदानात असणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा चर्चा सुरू असताना बेस्ट महामंडळाच्या निमित्ताने येथील निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्याची माहिती समोर आली आहे. बेस्ट पतपेढीची निवडणूक 18 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी येथील मनसे आणि ठाकरेंची शिवसेना संघटनांची युती झाल्याचे समजते. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेने युती झाली असून प्रणित उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत निवडणूक एकत्र निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा जोर धरत असतानाच आता महापालिका निवडणुकांपूर्वीच शिवसेना-मनसेची युती झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंकडून मनसैनिकांना महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे. 20 वर्षांनी आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही कशाला वाद निर्माण करता, असे म्हणत राज ठाकरेंनी मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांना एकत्रितपणे राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, पुढील काळात शिवसेना-मनसे युती होईल, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे. कारण, काही केल्या ठाकरेंना मुंबई महापालिका भाजपच्या किंवा महायुतीच्या ताब्यात जाऊ द्यायची नाही. महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा अबाधित ठेवण्याची ठाकरे बंधु एकत्र येऊ शकतात.