पीसीयू ची दिल्ली येथे एच.आर. कॉन्क्लेव संपन्न
पिंपरी, पुणे (दि. २६ मार्च २०२५) एआय सारखे उत्कृष्ट तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे, अनेक क्षेत्रात ते प्रभावीपणे काम करत आहे. या तंत्रज्ञानात मानवी भावनांची कमतरता आहे. त्यामुळे एआय सोबत मानवी संवेदना टिकून राहणं गरजेचं आहे. आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात देखील याचे महत्व वाढत आहे. याचा वापर मनुष्यबळ संसाधन अधिकाऱ्यांनी मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी करून घेतला पाहिजे, तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतः सतत अपडेट राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसयू) मधील एचआर शेपर्स च्या सहकार्याने दिल्ली येथे सोमवारी (दि.२४) एचआर कॉन्क्लेवचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते.
यावेळी शिक्षण आणि साक्षरता विभाग सचिव आनंदराव पाटील, संरक्षण मंत्रालय कार्यकारी संचालक सुशील गायकवाड, पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई तसेच डॉ. सचिन इटकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असून याला आणखी वेग देण्यासाठी मनुष्यबळ संसाधन विभाग (एचआर) यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी प्रस्ताविक करताना सांगितले की, देशातील प्रमुख एचआर, व्यावसायिक, सरकारी अधिकारी आणि उद्योग तज्ज्ञांना एकत्र करून विचार मंथन व्हावे या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २०२७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी एचआरची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी सर्व प्रतिनिधींना, व्यावसायिकांना पुण्यातील पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी (पीसीयू) परिसराला भेट देण्यासाठी आमंत्रण दिले.
यावेळी एआयच्या संधी आणि एआय सह कौशल्यवृद्धी या विषयावर पॅनेल चर्चा करण्यात आली. या सत्रात एचआर, व्यावसायिक, सरकारी अधिकारी आणि उद्योग तज्ज्ञांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगाने कसे बदलत आहे यावर चर्चा झाली. यामध्ये आनंदराव पाटील यांनी प्रतिभा विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण एचआर पद्धतींची गरज अधोरेखित केली.
सुशील गायकवाड यांनी आव्हानात्मक आणि गतिशील वातावरणात प्रभावी एचआर रणनीतीचा वापर कसा करू शकतो याचे अनुभव सांगितले.
डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीकडे अनेक कौशल्यं असतात. एचआर व्यावसायिकाची भूमिका म्हणजे योग्य व्यक्तीची निवड करून आवश्यक ते काम करून घेणे महत्वाचे असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजच्या काळात समाजासाठी एक उपयुक्त साधन बनलं आहे. याचा फायदा प्रत्येकाने घ्यायला हवा, कारण हे तंत्रज्ञान कार्य अधिक प्रभावी बनवण्यासोबतच वेळ आणि संसाधनांची बचत करतं असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी एच. आर. प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.