महाराष्ट्र जिंकण्यासाठी गुजरातमधील नेते ठाण मांडून

0
32

मुंबई, दि. ५ – लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. लोकसभेला भाजपला मतदारांनी नाकारल्याने अपेक्षित आकडा भाजपला गाठता आला नाही. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने (BJP) परराज्यातील नेते महाराष्ट्रात बोलवले आहेत. मध्यप्रदेशातील नेत्यांनंतर गुजरातमधील नेते महाराष्ट्रात ठाण मांडून मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.
गुजरातमधील आजी-माजी आमदारांनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली. हे नेते अमित शहा यांच्या मर्जीतील आहेत. महाराष्ट्र जिंकण्यासाठी गुजरात भाजपच्या नेत्यांची खास टीम तयार करण्यात आली आहे. हे नेते मतदारसंघानिहाय आढावा घेत आहेत. ४८ मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या गुजरातच्या नेत्यांप्रमाणे अन्य राज्यातील नेत्यांवरही जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा नॅरेटिव्ह सेट केला. त्याचा मोठा फटका भाजपला बसला होता.
त्यामुळे हे नॅरेटिव्ह खोडून काढण्याची जबाबदारी देखील या नेत्यांवर असणार आहे. या नेत्यांना पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करायची आहे. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय करायचे आहे. बूथ पासून वरच्या कमिट्यांपर्यंत आढावा घ्यायचा आहे. त्याचबरोबर पक्षातील अंतर्गत वाद, उमेदवाराबाबतचे लोकांचे मत याचे रिपोर्टींग वरिष्ठांना करावे लागणार आहे.