‘महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे’ संजय राऊत यांचा आरोप..

0
329

मुंबई दि. २१(पीसीबी) –  शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे  यांनी बंडाचं निशाण फडकवल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.महाराष्ट्रात सुरु असलेलं राजकारण हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत  यांनी केला आहे. भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस  सुरु केलं आहे, आमच्या आमदारांना किडनॅप करुन गुजरातला घेऊन जाण्यात आलं आहे, आमदारांवर गुजरात पोलीस आणि केंद्रीय पोलीसांचा पहारा लावण्यात आला आहे, तिथे जीवाला धोका असल्याचं आमदार सांगत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

शिवसेनेला कोणीही तोडू शकत नाही, आज संध्याकाळी पुन्हा बैठक आहे, अजय चौधरी यांची गट नेतेपदी निवड करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बंडाच्या भूमिकेवर बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे आमचे चांगले मित्र असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्याबरोबर एकत्र काम केलं आहे. त्यांच्या मनातील शंका दूर होईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.