महाराष्ट्रातील पहिले शून्य कचरा कार्यालय उपक्रमाचे उद्घाटन

0
227

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) : जागतिक शून्य कचरा दिवसाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने नेहरूनगर येथील क क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात महाराष्ट्रातील पहिले शून्य कचरा कार्यालय उपक्रमाचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.

प्रारंभी, “आम्ही कचरा निर्माण करत नाही, आम्ही संपत्ती निर्माण करतो ” या संकल्पनेवर आधारित उपक्रमाची आखणी करणारे क्षेत्रिय अधिकारी आण्णा बोदडे यांनी या संपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमात त्या क्षेत्रिय कार्यालयातील ४१ महिला व ९२ पुरुष असे १४३ अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रातील पहिले शून्य कचरा कार्यालय होण्याचा मान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळवून दिल्याबद्दल उपक्रमात सहभागी सर्व टीमचे अभिनंदन केले. महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये लवकरच शून्य कचरा उपक्रम राबविला जाईल, असे यावेळी आयुक्त सिंह यांनी यावेळी सांगितले. तसेच सर्व क्षेत्रिय कार्यालयात देखील शून्य कचरा उपक्रम लवकरात लवकर राबविण्याबाबत सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी सुचना दिल्या. या मोहिमेमध्ये महिलांप्रमाणे पुरुषांनी सुध्दा या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ , उपायुक्त अजय चारठाणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रिय अधिकारी आण्णा बोदडे, विजयकुमार थोरात, उमाकांत गायकवाड, सिताराम बहूरे, शीतल वाकडे, राजेश आगळे, सुचेता पानसरे, अमित पंडित स्वच्छ समन्वय कक्ष प्रमुख सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता संजय घुबे, शशिकांत मोरे, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे, सहायक आरोग्यधिकारी तानाजी दाते, जनसंपर्क विभागाचे वसीम कुरेशी, अभिजीत डोळस तसेच आयसी टीम, बेसिक टीम, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छतेविषयी जनजागृतीचे कार्य करणाऱ्या व टाकाऊ वस्तूंपासून विविध वस्तूंची निर्मिती करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान आयुक्त सिंह यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. महिला बचत गटांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल्स यावेळी लावण्यात आले होते. या सर्व स्टॉल्सला आयुक्तांनी भेट देऊन माहिती घेतली. आयसी टीम व बेसिक टीम यांनी यावेळी कचरा विलगीकरण विषयक जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले. अशाप्रकारे जनजागृतीचे कार्य करण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील यावेळी संपन्न झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनम देशमुख यांनी केले. राजेश आगळे यांनी आभार मानले.