दि . ८ ( पीसीबी ) – गतवर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाला. भाजपने स्वबळावर 132 जागांवर मजल मारली तर महायुतीने 235+ जागा जिंकून सत्ता स्थापन केली. पण या निवडणुकीवरील शंका आणि संशयाचे ढग अजूनही दाट आहेत. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सातत्याने या निवडणुकीवर शंका उपस्थित केली आहे.
यातच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निवडणुकीत महाघोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्राची निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती, असा आरोप करत राहुल गांधी यांनी 5 टप्प्यांमध्ये भाजपचे कारनामे सांगितले आहेत. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखामध्ये त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यांच्या या लेखानंतर भाजपने आकड्यांसह उत्तर दिले आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक म्हणजे निवडणूक कशी चोरली जाते याची ब्लू प्रिंट होती. पहिला टप्पा निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी पॅनेलमध्ये घोटाळा करणे हा होता. दुसऱ्या टप्प्यात मतदार यादीत बोगस मतदरारांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवली गेली. चौथ्या टप्प्यात भाजपला जिथे जिंकणे अशक्य होते तिथे बनावट मतदान करून घेण्यात आले. तर पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात सगळे पुरावे लपविले गेले, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
महाराष्ट्रात भाजप इतका हतबल का झाला होता, हे समजणे अवघड नाही. ही हेराफेरी मॅच फिक्सिंगसारखी आहे, फसवणूक करणारा पक्ष खेळ जिंकतो, परंतु संस्थांना नुकसान पोहोचवतो. निकालावरील जनतेचा विश्वास नष्ट करतो. सर्व चिंतित भारतीयांनी पुरावे पहावेत. स्वतः निर्णय घ्या. उत्तरे मागा. कारण महाराष्ट्राची मॅच फिक्सिंग आता बिहारमध्ये होईल आणि नंतरही जिथे-जिथे भाजपला पराभवाची भीती वाटते तिथे होईल, अशीही भीती गांधी यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी एप्रिलमध्येही राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टनमध्ये निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही, त्यांनी तडजोड केली आहे, अशी टीका केली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी अखेरच्या 2 तासांमध्ये लाखोंच्या संख्येने मतदान पडणे भौतिकदृष्ट्या अशक्य असल्याचे म्हंटले होते. एका मतदाराला मतदान करण्यासाठी सुमारे 3 मिनिटे लागतात, त्यामुळे इतक्या कमी वेळात इतकी मते टाकता येत नाहीत. आयोगाचा डेटा पूर्णपणे चुकीचा आहे, असा आरोप त्यांनी केला होता.