महायुतीत सगळे अलबेल नाही, नेत्यांच्या आरोपांनी जनतेची करमणूक

0
28

मुंबई, दि. 31 (पीसीबी) : महायुतीमधील तीनही पक्षांत गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रचंड धुसफूस सुरू असल्याने राजकारणात मोठी खळबळ आहे. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर माफी मागितली, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घटनेचा निषेध म्हणून राज्यभर निदर्शने केली. पुतळा नौदलाने उभारल्याचे मुख्यमंत्री सांगतात, तर तिकडे अजितदादा नौदल की पीडब्लूडी ने उभारला हे महत्वाचे नाही असे म्हणत थेट मुख्यमंत्र्यांवर निशाना साधतात. शिंदे आणि दादा यांच्यात रोज परस्पर विरोधी स्टेटमेंट सुरू झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत, तर दुसरीकडे लोकांची करमणूक होते आहे.

– शिंदे गटाचे नेते मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल बोलताना, त्यांच्याबरोबर बसलो की उलट्या होतात, असे तिखट वक्यव्य केले. दुसऱ्याच क्षणाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सावंतांना त्याच भाषेत सडेतोड उत्तर देत समाचार घेतला. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मिटकरी यांच्या दिशेने तोफ चालवली आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केले. मिटकरी यांनीही उधारी न ठेवता नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे अशा संपूर्ण कुटुंबाचाच उद्धार केला.
भाजपच्या आमदारांनी विधानसभेला अजितदादांच्या बरोबर नकोत म्हणून जाहीर विधाने सुरू केलीत, तर दुसऱ्या बाजुने सन्मान मिळणार नसेल तर सरकारमधून बाहेर पडा, अशी मागणी अजितदादा समर्थकांनी लावून धरली आहे.
– अजितदादांशी युती म्हणजे असंगाशी संग –
लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचाराला बाहेर पडलेच नाहीत. यामुळे भाजपाच्या खासदाराचा पराभव झाल्याचं प्रवक्ते गणेश हाके म्हणाले. त्यामुळं अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्दैवी आहे. खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगशी संग म्हणतात, असा संग घडला आहे असं हाके म्हणाले. दरम्यान, हाके यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते काय भूमिका घेणार हे पाहणं देखीवल महत्वाचं ठरणार आहे.

महायुतीचा धर्म आम्हीच पाळायचा का? –
अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे अहमदपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते म्हणतात आपली युती आहे. आपली युती होती तर तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का? असे म्हणत तुम्ही आमच्या खासदारांना पाडण्याचं काम केल्याचा आरोप यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केला. पैसे आमचे घेऊन काँग्रेसच्या पेंडलमध्ये तुमचे कार्यकर्ते नेते नगरसेवक बसत होते. लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडलेच नाहीत. यामुळे भाजपाच्या खासदाराचा पराभव झाल्याचं गणेश हाके म्हणाले. त्यामुळं अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्दैवी आहे. खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगशी संग म्हणतात असा संग घडला आहे असं हाके म्हणाले.