महायुतीचे जागावाटप ठरलं… भाजप १६०, शिंदे गट ७०, दादांना ५८ जागा

0
116

नवी दिल्ली, दि. ११ : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तुलनेत शिंदे गटाचा वरचष्मा राहिल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेसाठी विधानसभा निवडणुकीतही अधिक जागांची आग्रही मागणी करण्याची शक्यता दिसू लागली आहे. महायुतीमध्ये शिंदे गट अधिक प्रभावी झाल्यामुळे प्रदेश भाजपमध्ये अस्वस्थता वाढू लागली असून शिंदे गटाच्या संभाव्य जागांच्या मागणीला अंकुश लावण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे समजते.

राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये होणार असून महायुतीतील तीनही घटक पक्षांकडून जागावाटपाचा अंदाज घेतला जात आहे. शिंदे गटाकडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे १०० जागांची मागणी केली असल्याचे सांगितले जाते. ही मागणी मान्य केली तर भाजपला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील जागांपेक्षाही कमी जागा लढवाव्या लागतील. त्यामुळेच भाजपने १६० पेक्षा कमी जागा लढवू नये, अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना करण्यात आल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपने १६०-१७०, शिंदे गटाने सुमारे ७० व उर्वरित ५८ जागा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांना दिल्या जाव्यात असेही प्रदेश भाजपमधील नेत्यांनी सुचवले असल्याचा दावा सूत्रांनी केला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये भाजपने १५२ तर, शिवसेनेने १२४ व इतरांनी १२ जागा लढवल्या होत्या. पण, शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाची ताकदही विभागली गेली असल्यामुळे पाच वर्षांपूर्वीचे जागावाटपाचे सूत्र बदलावे लागेल. आत्ता महायुतीमध्ये भाजप हाच मोठा भाऊ असल्याने गेल्यावेळपेक्षा कमी जागा लढवणे उचित नसेल, असे मत प्रदेश भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वासमोर मांडले असल्याचे समजते.

शिंदे गटाची १०० जागांची मागणी मान्य केली तर भाजपच्या वाट्याला जेमतेम १२०-१३० जागा येतील वा भाजपला १६० जागा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा जागांचा वाटा कमी करावा लागेल. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देण्यात आल्या होत्या. मात्र, वाटणीला आलेल्या कमी जागांची भरपाई विधानसभा निवडणुकीत करण्याची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. महायुतीला मराठा मतदारांकडेही दुर्लक्ष करता येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची जागावाटपातील मागणीही भाजपला डावलता येणार नाही. त्यातून महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने महायुतीतील जागावाटपामध्ये भाजपने घटक पक्षांसमोर नरमाई न दाखवण्याची सूचना दिल्लीतील नेत्यांना केली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे