मविआ चा फॉर्मुला ठरला, काँग्रेस 119, शिवसेना 86, राष्ट्रवादी 75

0
16

मुंबई, दि. 15 (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. यापूर्वी आता महाविकास आघाडीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मविआच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही बोलणी आता शेवटच्या टप्प्यात असून मविआच्या संभाव्य जागावाटपाचे सूत्र समोर आले आहेत. त्यानुसार मविआने 119-86-75 अशा पद्धतीने जागावाटप करायचे ठरवल्याची माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ वर्तुळातून समोर आली आहे.

या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीला काँग्रेस 119, शिवसेना ठाकरे गट 86 आणि शरद पवार गट 75 जागा लढवेल, असे सांगितले जात आहे. तर शेकापला 3, समाजवादी पक्ष 3 आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला 2 जागा येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष 13 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. अद्याप 10 ते 15 विधानसभा मतदारसंघांचा तिढा कायम असल्याचे सांगितले जाते. मात्र, शरद पवार गट 10 पैकी 8 जागा जिंकत स्ट्राईक रेटच्या गणितात सरस ठरला होता. तरीही शरद पवार गटाने विधानसभेच्या जागावाटपात सर्वात कमी म्हणजे 75 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. शरद पवार यांची ही भूमिका राजकीय वर्तुळाला बुचकाळ्यात टाकणारी आहे. यामागे शरद पवार यांची काय राजकीय समीकरणे आहेत, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली आहे.