नवी दिल्ली, दि. २१ : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित संमेलनाचा भव्य उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यामुळे दिग्गजांच्या उपस्थितीत संमेलनाचा उद्घाटनाचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी स्वागत गीत गाण्यात आलं. यानंतर काश्मीर कन्या शमीमा अख्तर या तरुणीने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्रगीत गात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. शमीमा हिच्या अंभगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी स्वागतपर प्रास्ताविक भाषण केलं. या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. नरेंद्र मोदी यांना संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी आपण गेलो तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपण कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं आश्वासन दिलं, असं शरद पवार यांनी सांगितलं.
शरद पवार काय म्हणाले?
“मराठी सारस्वतांची दिंडी आज दिल्लीला आहे. याचा मला मनापासून आनंद आहे. केवळ महाराष्ट्र नाही तर मराठी माणसाने अटकेपार झेंडा फडकवला आहे. नोकरी कामाच्या निमित्ताने अनेक लोक देशाच्या कानाकोपऱ्यात दिसतात. मराठी साहित्याचा अद्भूत अनुभव घेण्यासाठी आपण इथे जमलो याचा मला मनापासून आनंद आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. या सारस्वतांच्या महामेळाव्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासून आनंद आहे”, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.
“आजचे साहित्य संमेलन मराठी भाषिकांच्या दृष्टीने आनंददायी घटनेच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे शासन, महाराष्ट्राचे साहित्यक, रसिक, या सगळ्यांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला, ती गोष्ट म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. हा दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी भाषिकांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करतो”, असं शरद पवार म्हणाले.
“1954 साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झालं. त्यावेळी देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी संमेलनाचे उद्घाटन केलं होतं. ते संमेलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी काकासाहेब गाडगीळ यांचं फार मोठं योगदान होतं. यानंतर 70 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत संमेलनाचे उद्घाटन होत आहे याचा आनंद आहे”, असं शरद पवार म्हणाले.
‘त्याचा बुरखा फाटला पाहिजे’, जीवे मारण्याच्या धमकीनंतर श्वेता महाले यांची पहिली प्रतिक्रिया
“मी ज्यावेळेला संमेलनाचं उद्घाटन देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी अक्षरश: एक मिनिट सुद्धा लावला नाही. महाराष्ट्राचा सोहळा आहे, सारस्वतांचा हा सोहळा आहे, माझी उपस्थिती आहे, असं त्यांनी सांगितलं. चंद्रभागेच्या काठी आषाढी कार्तिकेला जसे लाखो भाविक भक्तीभावाने जमतात तसंच साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्राचे हजारो साहित्यप्रेमी दरवर्षी येत असतात. हे साहित्य संमेलन तुमच्या माझ्या आयुष्याचे महत्त्वाचे भाग आहे”, असंदेखील शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.