मराठा समाजाला ओबीसीतूनचं आरक्षण मिळालं पाहिजे; या काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

0
23

जालना, दि. ११ (पीसीबी) : काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. “मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी भूमिका कल्याण काळे यांनी लोकसभेत मांडावी”, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याला कल्याण काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमच्या पक्षाची जी भूमिका असेल आणि राहील त्यासोबत मी राहीन. पण मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जी मांडलेली भूमिका आहे, त्यांच्याही भूमिकेला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर त्यावर आपण नंतर बोललं पाहिजे. अजून दिलंच नाही, त्याआधीच तुम्ही पाण्यात म्हैस आहे आणि वरच तिचा सावदा चालू आहे”, असा मिश्किल टोला कल्याण काळे यांनी लगावला.

“मी काही खोटं नाटक सांगून निवडून आलेलो नाही आणि तशी संस्कृती काँग्रेस पक्षाची देखील नाही. त्यांच्याच सरकारने सांगितलं होतं की 15-15 लाख रुपये खात्यात टाकेल. तशी आश्वासन देऊन मी काही निवडून आलो नाही. रावसाहेब दानवे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला जनतेने नाकारलेला आहे म्हणून मी पडलो”, असं जोरदार प्रत्युत्तर कल्याण काळे यांनी दिलं.

“जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा निश्चितपणे पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला झालेला आहे”, असं कल्याण काळे म्हणाले. “त्याचं कारण आहे की, जर कोणी सनदशीर मार्गाने आंदोलन करत असेल आणि त्याच्या त्या आंदोलनावर जर हे सरकार गोळ्या मारत असेल, लाठीचार्ज करत असेल तर स्वाभाविक आहे. समाजाला चीड येतेच म्हणून खऱ्या अर्थाने हे आंदोलन पेटलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया कल्याण काळे यांनी दिली.

राज्यपालांसोबत काय चर्चा केली? असा प्रश्न विचारला असता, “राज्यपाल आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी, आमदार, खासदार हे उपस्थित होते. संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. समस्या आम्ही सरकारला सांगून सांगून थकलेलो आहोत. सरकार काही करत नाही. तुम्हाला त्यामध्ये लक्ष घालावे लागेल, अशा मागण्या आम्ही त्यांच्याकडे मांडल्या”, अशी प्रतिक्रिया कल्याण काळे यांनी दिली.

“शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यांच्याकडून विमा भरून घेतला जातो. मात्र प्रीमियम दिला जात नाही. केवळ तोंड पुसण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. फुलंब्री मतदारसंघामध्ये 99 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवला. त्यामध्ये फक्त 42000 शेतकऱ्यांनाच विम्याची रक्कम देण्यात आली हे आमचा दुर्दैव आहे. त्यामुळे राज्यपाल यांना मी सांगितलं की, तुम्ही सगळ्या विमा कंपनीची बैठक राजभवनवर घ्या आणि त्यांचे कान टोचा आणि त्यांना सांगा शेतकऱ्यांना पिक विमा द्यायला. त्यावर राज्यपाल मला असं म्हणाले की विमा कंपन्याची मीटिंग राजभवनार घेतो आणि त्या कंपन्यांना सूचना देतो”, असं कल्याण काळे यांनी सांगितलं.